
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी वर्ष 2025 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर अनेक वस्तुंच्या भावात बदल झाला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आणखी एक अर्थसंकल्प शनिवार, 1 फेब्रुवारीला सादर करण्यात आला. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पानंतर 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत या सिलिंडरची किंमत 1 हजार 756 रुपये होती. त्यात 6.50 रुपयांनी कपात झाली आहे. आता हे सिलिंडर 1 हजार 749.50 रुपयांवर आले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. अर्थसंकल्पादरम्यान मारूती कंपनीनं आपल्या कारच्या किमतीत बदल केला आहे. मारूती कंपनीच्या अनेक कार आता 32 हजार रुपयांची महागल्या आहेत.
अर्थसंकल्पाच्या या घाईगडबडीत कोटक महिंद्रा बँकेने काही वस्तूंवर सेवा शुल्क वाढवले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत. प्राप्तीकराबाबत केंद्र सरकारनं नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता वार्षिक 12.75 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. आता गेल्या चार वर्षांतील आयटी रिटर्न्स देखील एकत्रित भरता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा वाढवून एक लाख करण्यात आली आहे. कर्करुग्णांना सरकारनं दिलासा दिला आहे. कर्करोगावर उपचार करणारी औषधं स्वस्त करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर डे-केअर सेंटर उभारली जाणार आहे.

बिहारवर लक्ष
निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना बिहारची काळजी घेतली आहे. बिहारमध्ये या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळं बिहारला झुकतं माप देण्यात आलं आहे. बिहारसाठी राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्थेची घोषणा करण्यात आली आहे. येथे आयआयटी देखील असेल. मखाना बोर्ड आणि तीन नवीन विमानतळं राज्याला मिळणार आहेत. पुढील ६ सहा वर्ष मसूर आणि तूर यासारख्या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित होणार आहे. देशाचा वस्त्रोद्योग बळकट करण्यात येणार आहे. स्टार्टअप्ससाठी कर्ज 10 कोटी रुपयांवरून 20 कोटी रुपये करण्यात आलं आहे. खेळणी उद्योगासाठी विशेष योजना सुरू होणाार आहे.
एआय तंत्रज्ञानासाठी 500 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. मेडिकल शिक्षण क्षेत्रात 75 हजार जागा वाढविण्याची घोषणाही करण्यात आली आहे. 36 जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल. निर्यात क्षेत्रात नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण योजनांमध्ये पोस्ट पेमेंट बँक पेमेंट सेवा वाढविली जाणार आहे. आता 180 कायदेशीर तरतुदींना गुन्हेगारी श्रेणीतून वगळण्यात आले आहे. राज्यांच्या सहभागाने 50 पर्यटन स्थळं विकसित होणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारामण यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला.