
नागपूरमधील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती कार्यरत झाली आहे. शांततेच्या दिशेने निर्णायक पावले उचलत, काँग्रेस नागपूरकरांसाठी ठामपणे उभी राहिली आहे.
नागपुरमध्ये नुकत्याच घडलेल्या हिंसक घटनांमुळे महाराष्ट्राच्या शांततापूर्ण वातावरणाला हादरा बसला आहे. या गंभीर परिस्थितीत सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी आणि दंगलग्रस्त भागातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. नागपूर शहरातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
राज्याच्या सामाजिक एकात्मतेला तडा जाऊ नये म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी संवेदनशीलतेने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्र हा सर्वधर्मसमभाव आणि बंधुतेचा गड मानला जातो, मात्र काही समाजविघातक शक्ती शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तातडीने पाऊल उचलून नागपूरमध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा ध्यास घेतला आहे.

प्रत्यक्ष आढावा
नागपूर शहरातील दंगलग्रस्त भागाचा प्रत्यक्ष आढावा घेऊन लोकांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेसने विशेष समिती नेमली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार माजी प्रांताध्यक्ष आणि गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण हे या समितीचे सदस्य असणार आहेत. तसेच नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे समितीचे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील हे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. ही समिती तातडीने नागपूरमध्ये दाखल होऊन परिस्थितीचा सखोल अभ्यास करेल. दंगलग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांची स्थिती जाणून घेईल आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यावर भर देईल.
हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्राची ओळख सामाजिक ऐक्य आणि शांततेची आहे. परंतु काही विघातक प्रवृत्ती समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने केवळ राजकीय टीका करण्यापेक्षा थेट कृतीशील भूमिका घेतली आहे. नागपूरमधील परिस्थिती सामान्य होईपर्यंत काँग्रेस आपल्या प्रयत्नांना विश्रांती देणार नाही. काँग्रेसची शांतता समिती स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागपूरकरांच्या सहकार्याने दंगलीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. दंगलग्रस्त भागातील पुनर्वसन, मदतकार्य, आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना करण्यासाठी समिती अहवाल सादर करेल.
महाराष्ट्रात स्थैर्याचा निर्धार
हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेश काँग्रेसच्या सर्व नेत्यांना आवाहन केले आहे की, राज्यात कुठेही अशांतता निर्माण होऊ नये यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. नागपूरमधील घटनेचा निषेध करत दंगलग्रस्त भागातील प्रत्येक नागरिकाला मदतीचा हात देण्याचा काँग्रेसचा दृढ संकल्प आहे. या संपूर्ण घटनेवर काँग्रेसचा सक्रिय आणि ठोस हस्तक्षेप झाल्याने हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व अधिक ठळकपणे पुढे आले आहे. नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस संघर्षशील राहणार आहे. सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पक्ष आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहे.
नागपूरमधील दंगलप्रकरणाने महाराष्ट्राच्या सामाजिक स्थैर्याला तडा देण्याचा प्रयत्न झाला असला तरी, काँग्रेसच्या त्वरित कारवाईमुळे सामाजिक ऐक्य टिकवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शांतता समितीचे कार्य येत्या काही दिवसांत निर्णायक ठरणार आहे. नागपूरमध्ये पुन्हा शांततेचे सूर उमटावेत, यासाठी काँग्रेसच्या या समितीच्या हालचालींवर संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे.