
भाजप सरकारच्या आश्वासनांची पडताळणी व्हायला हवी, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांच्या वचनाचा हिशोब मागण्यात आला आहे.
आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही, पण जनतेच्या मनात निर्माण झालेले प्रश्न मांडणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक आश्वासनांची आठवण करून देत सध्याच्या वास्तवावर लक्ष केंद्रित केलं.
सपकाळ म्हणाले, 2014 मध्ये दोन कोटी नोकऱ्यांचं आश्वासन, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपयांचं वचन, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, स्वामिनाथन आयोग लागू करणार, स्मार्ट सिटी तयार होणार. पण आजपर्यंत ह्या गोष्टी केवळ भाषणांपुरत्याच मर्यादित राहिल्या. मोदींचा कारभार म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे.

अनेक प्रश्न
त्यांनी पुढे सांगितले, अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ‘हेट स्पीच’ प्रकरणात आले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर काय घडलं, अदानी-अंबानी यांची संपत्ती कशी आणि किती वाढली, हे देखील जनतेसमोर स्पष्ट व्हायला हवं. सपकाळ यांनी अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांनाही लक्ष्य करत विचारलं, त्यांनी पेट्रोल दर, लोकपाल अशा मुद्द्यांवर आवाज उठवला होता, मग आता त्या विषयांचं काय झालं? त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे.
महाराष्ट्रातील सध्याच्या शेतकरी समस्या, पीककर्ज, कर्जमाफी व बियाण्यांचा तुटवडा यावर बोलताना सपकाळ म्हणाले, या सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यायला हवी होती, पण त्याऐवजी त्यांच्या समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे उचलले जात आहेत. निवडणूक प्रक्रियेबाबत त्यांनी गंभीर आरोप करत सांगितलं, संध्याकाळी सहा नंतर अचानक 74 लाख मतदान कसं वाढलं? निवडणूक आयोगाचे वर्तन पक्षपाती वाटत आहे. आम्ही आधीच यावर लेखी तक्रार केली होती. मतांवर डल्ला मारण्यामागे किरण कुलकर्णी सूत्रधार आहे. त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे.
Yashomati Thakur : निवडणूक आयोगाला भाजपची बाजू का मांडावी लागते
टक्केवारीत वाढ
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वी काँग्रेसने पुराव्यांसह निवडणूक आयोगात धाव घेतली होती. आता पाच वाजल्यानंतर 8.74 टक्के मतदान कसं वाढलं, याचं उत्तर द्यावं लागेल. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील एकत्र येण्याचा निर्णय त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच, ठाकरे बंधू एकत्र येतील का याबाबत ते स्वतःच योग्य स्पष्टीकरण देतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेसने तयारी दर्शवली असून, आमचे स्थानिक नेते संघटितपणे निर्णय घेतील आणि त्याची माहिती आम्ही वेळोवेळी देत राहू, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. शेवटी बच्चू कडू यांच्या मागण्यांवर ते किती दिवस ठाम राहतात, हे पाहूनच काँग्रेस आपला पुढचा निर्णय घेईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.