महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : दाल मे काला नही, ‘संपूर्ण डाळच काळी’

Congress : प्रदेशाध्यक्षांचा मोदी सरकारवर हल्ला 

Author

कामगार संघटनांचे पूर्वीचे बळ कमी होत चालले असताना, कंत्राटी पद्धती आणि आऊटसोर्सिंगमुळे कामगारांचे शोषण अधिकच वाढले आहे. या अन्यायकारी व्यवस्थेविरोधात संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

कधी काळी देशाच्या औद्योगिक क्षेत्रात कामगार संघटनांचे मोठे वर्चस्व होते. त्यांचा आवाज बुलंद असे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास चक्का जामसारख्या तीव्र आंदोलनांनी संपूर्ण व्यवस्था ठप्प होत असे. मात्र, आज परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद पडत आहेत, तर दुसरीकडे आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीमुळे कामगारांच्या शोषणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हे शोषण आता फक्त महानगरांपुरते मर्यादित न राहता गावखेड्यांपर्यंत पोहोचले आहे. ही अन्यायकारी व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी आणि भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर तीव्र हल्ला चढवला. ते म्हणाले की, पूर्वी उद्योगपती उत्पादन क्षेत्रावर नियंत्रण ठेवत होते, मात्र आता व्यापाराच्या नावाखाली नफेखोरीचा खेळ सुरू आहे. या नवउदारमतवादी व्यवस्थेमध्ये कामगारांचे कल्याण गौण ठरले आहे, आणि त्यांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे.

Uddhav Thackeray : वर्षभर शिमगा, निवडणुकीत पुरणपोळी

सपकाळ यांचा हल्लाबोल

देशात संपत्तीचे प्रचंड असमान वितरण सुरू आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तर गरीब अधिक गरीब होत चालले आहेत. पण देशाचे पंतप्रधान या परिस्थितीची दखल घेण्याऐवजी ‘श्रीमंतांनी श्रीमंत होणे पाप आहे का? असे विधान करतात. यावरूनच स्पष्ट होते की, सरकार गरीब व कामगारवर्गाच्या कल्याणासाठी नाही, तर मूठभर उद्योगपतींच्या हितरक्षणासाठी काम करत आहे,” असे सपकाळ म्हणाले.

मोदी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका करताना सपकाळ म्हणाले, “ही सत्ता म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही, तर संपूर्ण डाळच काळी आहे. सरकारच्या धोरणांमध्ये पारदर्शकता नाही, नियत खोटी आहे आणि कामगारविरोधी भूमिका उघड आहे.

Parinay Fuke : महाज्योतीच्या हितासाठी सरसावले आमदार

शांत बसणे अयोग्य

कामगार आणि कष्टकऱ्यांच्या संघर्षाशिवाय सामाजिक समतोल राखणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक श्रमिकाने संघटीत होऊन आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे. “कामगारांच्या हक्कांची पायमल्ली होत असताना आपण शांत बसणे योग्य नाही. केवळ भाषणं देऊन काही साध्य होणार नाही, आता कृती कार्यक्रम हाती घेऊन मोठी चळवळ उभी करावी लागेल. अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे,” असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

कामगारांचे हक्क, त्यांच्या रोजगाराची शाश्वती आणि शोषणविरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी व्यापक आंदोलन हवे, अन्यथा भविष्यातील संकट अधिक गंभीर स्वरूप धारण करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!