
आषाढी वारीच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे एका दिवसासाठी वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होणार आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर यवत ते वरवंड या टप्प्यात ते पायी चालत विठ्ठलभक्तीचा अनुभव घेणार आहेत.
वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी निघाले आहेत. आषाढ मास आला की, महाराष्ट्रातील रस्ते एक वेगळीच अनुभूती देतात. टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबांच्या नामाचा जयघोष, आणि हातात भगवी पताका घेऊन चालणारे भक्त. पंढरपूरच्या वारीला शतकानुशतकांची परंपरा लाभलेली आहे. या अध्यात्मिक प्रवासाला फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक संदर्भही जोडले गेले आहेत. या परंपरेचा अनुभव घेण्यासाठी यंदा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक दिवस वारीत चालण्याचा संकल्प केला आहे.
24 जून मंगळवारी सकाळी 7 वाजता पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावातून सुरू होणाऱ्या दिंडी क्रमांक 282 मध्ये सपकाळ सहभागी होणार असून, ते वरवंड गावापर्यंत पायी चालणार आहेत. वारीतील हा टप्पा दिवसभराचा असून, सपकाळ संपूर्ण दिवस दिंडीसोबत चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष स्थान
वारीत सामील होणं म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेचं प्रतीक नसून, एका विशिष्ट विचारप्रवाहाशी स्वतःला जोडण्याची प्रक्रिया असते. पंढरपूरच्या वारीप्रमाणेच शेगावच्या गजानन महाराज पालखी वारीलाही महाराष्ट्राच्या अंत:करणात विशेष स्थान आहे. शेगावच्या वारीला अकोला, बुलढाणा, जळगाव, वाशीम अशा जिल्ह्यांतून हजारो वारकरी पायी चालत येतात. गजानन महाराजांची ही वारीही भक्तांच्या निस्सीम श्रद्धेचा पुरावा आहे.
ही परंपरा केवळ भावनेची नाही, तर समतेची शिकवण देणारी आहे. सपकाळ यांनी वारीतील सहभागाबाबत केलेले वक्तव्य सामाजिक सलोखा आणि परंपरेच्या मूल्यांवर विचार करण्यास भाग पाडणारे ठरते. त्यांच्या मते, वारीत जात, धर्म, पंथ यांचं कोणतंही भेदभाव नसतो. ही शतकानुशतक टिकून असलेली समतेची चळवळ आहे. हीच महाराष्ट्र धर्माची खरी ओळख आहे.
Bacchu Kadu : अन्नत्याग नंतर सातबारा कोरा करा आंदोलनाची नवी सुरुवात
नवीन दृष्टिकोनाची आठवण
वारीत आजवर अनेक विचारवंत, लेखक, कलाकार, अधिकारी, समाजसेवक सहभागी झाले आहेत. हे सहभागी होणं म्हणजे केवळ ‘दृश्य राजकारण’ नसून, स्वतःला त्या अनुभवाशी जोडण्याचा एक प्रयत्न असतो. आज समाज धर्माच्या, जातीच्या भिंतींमध्ये अडकताना दिसतो. अशा वेळी वारीसारखी शांती, समर्पण आणि समतेची चळवळ एका नवीन दृष्टिकोनाची आठवण करून देते. वारीच्या पावलांशी एकरूप होण्याचा सपकाळ यांचा हा निर्णय, त्यांच्या व्यक्तिगत श्रद्धेचा भाग असो वा सामाजिक संवादाचा एक भाग, तो चर्चेचा मुद्दा मात्र नक्कीच ठरत आहे.
वारीत सहभागी होणे, भगव्या पताकेखाली टाळाच्या तालावर चालत “विठ्ठल! विठ्ठल!” म्हणत पंढरीची वाट धरणे, हे प्रत्येकाच्या मनात काहीसा अध्यात्मिक उत्सव उभा करतं. वारी ही महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. ही परंपरा जपणे, तिच्याशी जोडले जाणे हेच खरे ‘महाराष्ट्र धर्म’ जागवणं ठरतं. हर्षवर्धन सपकाळ यांचा वारीतील सहभाग नेमका हाच संदेश देतो का? की यामागे काही राजकीय संकेत लपलेले आहेत? हे येणारा काळ सांगेल.