महाराष्ट्र

Congress : मतांची मॅजिक ट्रिक, आता सत्यासाठी मशालची क्लिक 

Maharashtra Politics : सरकार आणि आयोगावर सोडणार प्रश्नांचे बाण

Author

विधानसभा निवडणुकीतील कथित मतचोरीविरोधात काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसला पराभव अजूनही पचनी पडलेला नाही. त्यामुळे आता राज्यभर मशाल मोर्चांचे आयोजन करून लोकशाही रक्षणाचा निर्धार करण्यात आला आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जे काही घडलं, त्याने लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांनाच सुरुंग लावल्याचा आरोप करत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांची चोरी करून भाजप-युतीने सत्ता मिळवली, असा गंभीर आरोप काँग्रेस करत आहे. काँग्रेसने गुरुवार 12 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मशाल मोर्च्यांचं आयोजन केलं आहे. या मोर्च्याच्या माध्यमातून काँग्रेस जनता जागृती करणार असून सरकारवर टीकेचे आणि प्रश्नांचे बाण सोडणार आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस महायुती सरकारवर जोरदार आरोप करत आहे. महायुती सरकार मतांची चोरी करून स्थापन झालेले सरकार असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. विधानसभा निवडणुकीतील ‘मतचोरी’च्या प्रकरणाची चौकशी करण्याची जोरदार मागणी करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः गडचिरोलीमध्ये करतील, तर राज्यभरातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध जिल्ह्यांमध्ये मशाल घेऊन रस्त्यावर उतरतील.

बहुमत शक्यच नाही

काँग्रेसच्या आरोपानुसार, 2025 विधानसभा निवडणुकीत भाजप युतीला एवढं बहुमत मिळणं म्हणजे अनाकलनीय आणि अविश्वसनीय प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं असताना, त्या पार्श्वभूमीवर भाजप युती 100 जागाही पार करू शकणार नाही, अशी स्थिती होती. तरीही त्यांच्या खात्यावर स्पष्ट बहुमत कसं काय गेलं, हा काँग्रेसचा मुख्य सवाल आहे.

निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या एकंदर चित्राबाबत काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे. मतदानाच्या दिवशी 58 टक्के मतदान झाल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी हे प्रमाण अचानक 66.5 टक्के झालं. म्हणजे तब्बल 7.83 टक्क्यांनी वाढ दाखवली गेली. यामागे गंभीर शंका निर्माण होत आहे. काँग्रेसने हे ‘मतांच्या पेटीतले मॅच फिक्सिंग’ असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Akola : शासकीय डोळ्यांत धुळ फेकत ‘प्रहार’चे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

सत्य शोधण्याचा प्रयत्न

निवडणूक आयोग निष्पक्ष, पारदर्शी आणि लोकशाही टिकवणारा घटक असावा लागतो. पण जर त्याच्यावरच अविश्वास निर्माण झाला, तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळेच या ‘मतचोरी’ प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, आणि जनतेसमोर सत्य आणावं, अशी काँग्रेसची भूमिका आहे. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. हे मोर्चे संपूर्ण राज्यात एकाचवेळी निघणार आहेत. मशालींचा प्रकाश हा मतांच्या अंधारात लपवलेल्या सत्याला उघड करणारा ठरेल, असा काँग्रेसचा विश्वास आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!