महाराष्ट्र

सत्ता न आल्यानं Congress पुढे 50 लाखांचा प्रश्न

महाराष्ट्रात State President बदलाच्या प्रक्रियेला वेग

Share:

Author

लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर राज्यात काँग्रेसचे भाव वाढले होते. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार. आघाडीचा मुख्यमंत्री होणार असंच चित्र होतं. पण सगळ्यांचेच फासे उलटे पडले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी भुईसपाट झाली आहे. काँग्रेसचं इतके जबरदस्त पानीपत झालं आहे की त्यांना विरोधी पक्षनेते पदही मिळणार नाही. या पराभवानंतर महाराष्ट्रात नाना पटोले हटाव मोहीम तीव्र झाली आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा सादर केला आहे. सध्या काँग्रेस ‘हायकमांड’ने हा राजीनामा ‘होल्ड’वर ठेवला आहे. अमित देशमुख हे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आहे. मात्र या सगळ्यात काँग्रेसला 50 लाख रुपयांच्या खर्चाची चिंता सतावत आहे. हा काँग्रेसचा केवळ एक महिन्याचा खर्च आहे. प्रदेश कार्यालय चालविण्याचा. केंद्रात आणि राज्यात काँग्रेस विरोधी पक्षात आहे. केंद्रात अनेक दिवसांपर्यंत काँग्रेस विरोधी पक्षनेते पदापासूनही दूर होती. त्यामुळं काँग्रेसपुढं पक्षनिधी गोळा करण्याचं मोठं आव्हान होतं.

सलग तीन टर्म केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यामुळं मोठे उद्योगती आणि इतर क्षेत्रातील सगळेच भाजपला मोठ्या प्रमाणावर ‘फंडिंग’ करीत आहेत. याउलट काँग्रेसच्या सभांच्या ठिकाणी क्युआर कोड लावत पक्षासाठी निधी गोळा करावा लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत काँग्रेसच्या भरवश्यावर अनेक नेते मालामाल झालेत. परंतु काँग्रेसच्या एकाही नेत्यानं आजपर्यंत पक्षासाठी एक रुपयाही खिशातून बाहेर काढलेला नाही. अशात महाराष्ट्रातील प्रदेश कार्यालयाचा खर्च वाचलिण्यासाठी काँग्रेसला दरमहा 50 लाख रुपये खर्च येतो. महाराष्ट्रातील हा खर्च कसा करायचा असा प्रश्न काँग्रेसपुढं आहे.

शिवसेनेत “उदय” होणार “सामंत” गट ?

अन् तु माझ्याकडं वळून बी पाहिना

मध्यंतरीच्या काळात अजय-अतुल यांच्या एका गाण्यानं तुफान प्रसिद्धी मिळविली. ‘जीव झाला येडा-पिसा, रात रात जागणं. पुरं दिस भर तुझ्या फिरतो माग मागनं. जादू मंतरली कुनी, सपनात जागपनी. नशिबी भोग असा दावला. मागं पळून पळून वाट माझी लागली. अन् तू वळून बी माझ्याकडं पाहिना’ असे या गाण्याचे बोल. सध्या काँग्रेची महाराष्ट्रातील अवस्था अशीच झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा जीव सत्तेसाठी येडापिसा झाला होता. विजयासाठी नेत्यांनी रात्र रात्र जागून काढल्या. पण कसं कोणतं जादूमंतर झालं की महायुतीला बहुमत मिळालं, असा धक्का काँग्रेसला बसला आहे. त्यामुळं काँग्रेसच्या नशिबी पराभवाचा भोग आला आहे.

आता काँग्रेसचे नेते पक्षनिधी आणि विरोधी पक्षनेते पदासाठी अनेकांच्या मागं धावत सुटले आहे. सत्ता आणि पद असेल तर कोणीही पक्षाला निधी देतो. नेत्यांचे खिसे गरम करतो. पण ज्यांच्या जवळ विरोधी पक्षनेता पदही नाही त्यांना कोण विचारणार असं चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळं काँग्रेसचे नेते पक्ष निधी गोळा करण्यासाठी फिरत आहेत. पण कोणीही त्यांच्याकडं वळुन पाहात नसल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत प्रदेश कार्यालयाचा दरमहिन्याचा किमान 50 लाख रुपयांचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न नेत्यांना भेडसावत आहे.

या चिंतेतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे देखील सुटलेले नाही. त्यामुळं पटोले यांना हटवून प्रदेशाध्यक्ष कोणीही झालं तरी त्याला पक्ष आणि पक्ष कार्यालयाच्या खर्चाचा डोंगर पेलावा लागणार आहे. त्यामुळं अजय-अतुलच्या याच गाण्यातील आणखी काही ओळी येथे अगदी लागू पडतात, की प्रदेशाध्यक्ष पदाच्या ‘पिरतीचा हा इंचू असा चावला’. विंचवाच्या डंखाचं विष असं जगूही देत नाही आणि मरूही देत नाही, तशाच वेदाना नव्या प्रदेशाध्यक्षांनाही सोसाव्या लागणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. हिंदीत एक म्हण आहे. ‘जिसकी लाठी उसकी भैस’. सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेची काठी महायुतीच्या हातात आहे. त्यामुळं सगळा माल आणि ताल त्यांचाच राहणार आहे. आणखी काही दिवस तरी काँग्रेसची अवस्था ‘मागं पळून पळून वाट माझी लागली. अन् तू वळून बी माझ्याकडं पाहिना’ अशीच राहणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!