महाराष्ट्र

काँग्रेसमधून Nana Patole आऊट; कोणाचं येणार राज्य?

लिस्टमध्ये Prithviraj Chavan, Balasaheb Thorat शर्यतीत आघाडीवर

Author

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून आमदार नाना पटोले आऊट झाले आहेत. आता लवकरच नवीन प्रदेशाध्यक्षाची नेमणूक होणार आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीच्या चर्चा सध्या रंगात आहेत. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर बदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या चर्चांवर आता स्वतः नाना पटोले यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. हा तिढा याच आठवड्यात सुटेल. राहुल गांधी यांच्याशी याबाबत चर्चा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीतील अपेक्षित निकाल न लागल्याने पक्षात अंतर्गत कलह वाढला आहे. या पराभवाला जबाबदार कोण, यावर पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. नाना पटोले यांचे नेतृत्व प्रभावी ठरले नाही, अशी टीका काही काँग्रेस नेते गुपचूप करत होते. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती.

टळले अपघात; Central Railway कर्मचाऱ्यांची थोपटली पाठ

अनेक जण स्पर्धेत

नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याबद्दल काँग्रेसच्या गोटात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, अमित देशमुख यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे या शर्यतीत आघाडीवर आहेत. काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची परंपरा आहे, असे म्हणत नाना पटोले यांनीही इशारा दिला आहे की, लवकरच नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या कॅप्टनची घोषणा कधी आणि कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षात कोणाचे वर्चस्व राहणार, यावरून मतभेद वाढले आहेत. नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपदावर राहणे पक्षाच्या हिताचे नाही, असे अनेक नेते अप्रत्यक्षपणे सांगत होते. निवडणुकीत खराब प्रदर्शनामुळे पक्षाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळे पक्षाच्या पुनर्रचनेसाठी प्रदेशाध्यक्ष बदल होण्याची शक्यता निर्माण झाली.

फडणवीसांना हवंय Eknath Shinde यांच्याकडून ब्रेकअप?

निर्णायक टप्पा

नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याबाबत सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्तेही उत्सुक आहेत. पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता नेतृत्वबदल अनिवार्य वाटत आहे. नव्या अध्यक्षाखाली पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणते धोरण अवलंबले जाईल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचा भविष्यातील राजकीय प्रवास कसा असेल, यावर हा बदल मोठा परिणाम करू शकतो.

महाराष्ट्र काँग्रेससाठी हा निर्णायक टप्पा आहे. पक्षाला नव्या उर्जेची गरज आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, नवीन नेतृत्व पक्षाला एकसंघ ठेवण्यात यशस्वी ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी काळात काँग्रेसच्या गोटात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!