महाराष्ट्र

Prafulla Gudadhe : मुख्यमंत्री म्हणजे फोडाफोडीचे मास्टर

Congress : प्रशासन नाही हे भाजप सत्तेचे बाहुले  

Author

काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रभाग रचनेत हस्तक्षेप करून राजकीय हेतूंनी विभाजन करण्याचा आरोप केला आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका करताना काँग्रेसने एक मोठा राजकीय बॉम्बच टाकला आहे. मुख्यमंत्री दोन दोन पक्ष फोडू शकतात, तर प्रभाग फोडणे त्यांच्यासाठी काहीही मोठं नाही, अशी जहाल टीका काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी केली. गुडघे पाटील म्हणाले, ते फोडाफोडीचे एक्सपर्ट आहेत. वेशांतर करून पक्ष फोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना प्रभाग फोडणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे.

गुडधे यांनी दलित आणि अल्पसंख्यांक वस्त्यांच्या फोडणीवरून देखील तीव्र आक्षेप नोंदवले आहे. सत्ताधारी राजकीय सोयीसाठी नियम पायदळी तुडवतील, असा इशाराही त्यांनी दिला. महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने प्रभाग रचना करण्याचे अधिकार प्रशासनाला दिले आहे. मात्र ही रचना निष्पक्ष न होता भाजपप्रणीत राजकीय हेतूंनी प्रभावित होईल, अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे. प्रशासक म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मुखवटा, असा घणाघात करत गुडघे पाटील यांनी म्हटले की, प्रशासनाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी स्वतःच प्रभाग रचना सुरू केली आहे.

 

काँग्रेसची स्वबळ तयारी

 

गुडधे यांनी याही पुढे जात सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले की, राजकीय स्वार्थासाठी नागरिकांची सेवा दुर्लक्षित केली जाईल आणि दलित, अल्पसंख्यांक वस्त्या योजनाबद्ध पद्धतीने फोडल्या जातील. काँग्रेसने प्रशासनावर पक्षपातीपणाचे आरोप करत म्हटले की, हे अधिकारी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे गुलामच आहे. दरम्यान, नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे. शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाहीर केले की, नागपूरच्या 151 प्रभागांमध्ये आमची तयारी पूर्ण झाली आहे. आमच्या प्रभाग समित्या कामाला लागल्या आहे.

 

काँग्रेसच्या या भूमिकेमुळे ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटाला राजकीय धक्का बसला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या तू-तू, मै-मै च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही घोषणा अधिक लक्षवेधी ठरत आहे. अंतिम निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सोडण्यात आला आहे. एकीकडे काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांवरून राजकीय तापमान चांगलंच वाढतंय. प्रभाग रचना, प्रशासकीय हस्तक्षेप आणि अल्पसंख्यांक व दलित वस्त्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

 

राजकीय अनुकूलतेसाठी लोकशाहीच्या प्रक्रियेला वळण लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असल्याचा ठपका काँग्रेस लावत आहे. आता निवडणुकीचा काळ जवळ येतोय आणि या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेतील रणधुमाळी अजूनच रंगतदार होणार, हे निश्चित.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!