महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : गुन्हेगाराला शिक्षा नको, कारण खर्च वाढेल

Maharashtra : शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी वडेट्टीवार संतापले

Author

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटे प्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी हा निकाल लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या निर्णयात, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोकाटेंना मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवण्याच्या गैरप्रकारप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा कायम राहिल्यास त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार राहिली असती. मात्र, नाशिक न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

न्यायालयाने शिक्षेच्या संभाव्य परिणामांचा विचार करत कोकाटेंना स्थगिती दिली. जर त्यांना शिक्षा झाली असती, तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची गरज भासली असती आणि त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडला असता. याच कारणास्तव, न्यायालयाने शिक्षेला तात्पुरती स्थगिती देताना निवडणुकीचा खर्च हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे निरीक्षण नोंदवले. मात्र, हा निर्णय विरोधकांना अजिबात रुचलेला नाही आणि त्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Yashomati Thakur : महाराष्ट्राची माती द्वेषाच्या वाळुसारखी उडून जाणार नाही

विरोधक संतापले

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही गुन्हेगार दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण जर न्यायालय निवडणुकीच्या खर्चाचा विचार करत शिक्षा थांबवत असेल, तर उद्या एखाद्याने खून केला तरी त्यालाही सूट द्यायची का? असेही ते बोलले.

वडेट्टीवार यांनी याप्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालय जर अशा तर्कावर आधार घेणार असेल, तर लोकांनी न्याय कुठे मागायचा? हा न्यायाचा अपमान आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

Congress : राणेंच्या सिंधुदुर्गातील गडाला सपकाळांकडून सुरुंगाचे प्रयत्न

बळीराज्याचा प्रश्न

राजकीय वादंगात शेतकऱ्यांचे प्रश्नही ऐरणीवर आले आहे. वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांमध्ये नंबर वन राज्य ठरल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राज्यातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्याला कर्जमाफीची तातडीने गरज आहे. सरकारने कर्ज काढले तरी चालेल, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे अत्यावश्यक आहे, असे ते ठामपणे म्हणाले.

बुलढाण्यातील एका युवा शेतकऱ्याच्या मृत्यू बाबत संताप व्यक्त केला. सरकार एका तरुण शेतकऱ्याला पुरस्कार देऊन गौरवते, पण त्याच शेतकऱ्याला पाणी आणि वीज मिळत नाही म्हणून आत्महत्येची वेळ येते. मग अशा पुरस्कारांना काय अर्थ आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी शासनाच्या शेतकरी धोरणांवरही जोरदार टीका करत, सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारूनही शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत, ही महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी नोंद आहे, असे ठामपणे सांगितले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!