
पर्यटकांवर झालेल्या पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत गुप्तचर यंत्रणांच्या अपयशावर बोट ठेवले आहे.
पहलगाममध्ये घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत सुरक्षेच्या यंत्रणेवर गंभीर सवाल उपस्थित करत भाजपच्या राजवटीतील गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याचे सांगितले.
वडेट्टीवार म्हणाले की, दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांना लक्ष्य करत केलेल्या गोळीबारात 27 निरपराधांचा बळी गेला. यात एक इटालियन, एक इस्रायली आणि देशातील विविध राज्यांतील नागरिकांचा समावेश होता. हे केवळ निंदनीय नाही, तर सरकारच्या असंवेदनशीलतेचे भयानक दर्शन आहे.

IAS Transfer : चंद्रपूर, बीड अन् नागपूरला नवे कर्तृत्ववान नेतृत्व
सरकारच्या दुर्लक्षामुळे बळी
पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये घडलेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. केंद्र सरकारने त्याकडे अत्यंत हलक्याफुलक्या पद्धतीने पाहिल्याचे स्पष्ट दिसते. हजारो पर्यटक काश्मीरमध्ये फिरत आहेत. त्यांच्या सुरक्षेची कोणतीही ठोस योजना केंद्र सरकारने आखली नव्हती. दहशतवाद्यांनी हल्ला करताच काही मिनिटांत घटनास्थळावरून पसार होणे, हे गुप्तचर संस्थांचे अपयश स्पष्ट करते. या घटनेमुळे केंद्र सरकारची संपूर्ण यंत्रणा झोपेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करत सांगितले की, अशा प्रकारच्या घटनांचा उपयोग करून देशातील दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकार देशाच्या सामाजिक एकतेला खिळ बसवण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. दहशतवादी कारवायांचा वापर करून धार्मिक ध्रुवीकरणाची चाल रचली जात असल्याचे वडेट्टीवारांचे म्हणणे आहे. त्यांनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला कठोर शब्दांत फटकारले.
देशाची एकात्मता धोक्यात
घडलेल्या घटनांमुळे देशाच्या सुरक्षेची कल्पना उभी राहते. विजय वडेट्टीवार यांनी अशा घटना देशातील एकात्मतेला धक्का देणाऱ्या असल्याचे सांगत केंद्र सरकारने यामध्ये गांभीर्याने पावले उचलावीत, अशी भावना व्यक्त केली. पर्यटकांचे प्राण वाचवण्यात अपयशी ठरलेले प्रशासन आणि यंत्रणा ही केंद्र सरकारच्या जबाबदारीचा भाग आहे. दहशतवाद्यांचे मनोबल वाढू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले.