
राहुल गांधींसोबतच्या खोट्या फोटोवरून सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. गुप्तहेर म्हणून अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राशी संबंधित दावा खोटा ठरला आहे.
सध्या सोशल मीडियावर दोन फोटो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. यात असा दावा करण्यात येत आहे की, पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचा राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रा दरम्यानचा फोटो आहे. या दाव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चा, गोंधळ आणि आरोपांची लाट उसळली आहे. मात्र या प्रकरणात सत्य काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
घडलेल्या प्रकरणात सर्वात ठळक प्रतिक्रिया उमटली ती काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची. त्यांनी हा संपूर्ण प्रकार म्हणजे खोटं पसरवण्याचा भाजपचा नीच प्रयत्न असल्याचा आरोप करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर थेट आरोप केला आहे.

प्रतिमेला डाग
यशोमती ठाकूर यांनी थेट सांगितलं की, हे बनावट फोटो तयार करून राहुल गांधींच्या प्रतिमेला डाग लावण्याचा कट रचला गेला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे बंधू संजय फडणवीस यांना जबाबदार धरलं आहे. ठाकूर म्हणाल्या की, संजय फडणवीस हे सातत्याने फेसबुकवर खोट्या, भडक पोस्ट करत असतात. त्यांनीच राहुल गांधी आणि ज्योती मल्होत्राचा बनावट संबंध जोडणाऱ्या फोटोंची पेरणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, ही मानसिकता संघ परिवारातून आलेल्या लोकांची असून, ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ हेच तत्त्व इथं राबवलं जातं. काँग्रेसच्या मते, हे सगळं केवळ राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी केलं जात आहे.
जे दोन फोटो सोशल मीडियावर पसरवले जात आहेत, त्यातील पहिल्या फोटोतील महिला ज्योती मल्होत्रा नसून त्या अदिती सिंह आहेत. त्या रायबरेली येथील भाजपच्या आमदार आहेत. या फोटोतील वेळ 2017 सालातील आहे. त्यावेळी अदिती सिंह काँग्रेसमध्ये होत्या. त्यामुळे या फोटोत कोणताही संशयास्पद संदर्भ नाही. दुसरा फोटो भारत जोडो यात्रेचा असला तरी त्यातील महिला ही केरळमधील स्थानिक कार्यकर्ती आहे. तीचा ज्योती मल्होत्राशी काहीही संबंध नाही, हेही स्पष्ट झालं आहे.
खोट्या प्रचाराविरुद्ध आक्रमक
संपूर्ण घटना म्हणजे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं षड्यंत्र आहे, असं काँग्रेसने ठामपणे म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी या खोट्या फोटोमागील राजकीय हेतूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्या म्हणाल्या की, जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा भाऊ अशा प्रकारच्या वादग्रस्त आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट करतो, तेव्हा हे सरकार काय शिकवतं, हेच जनता विचारू लागते.
घडलेल्या प्रकरणातून एक मोठा धडा मिळतो. तो म्हणजे सोशल मीडियावर पसरवली जाणारी माहिती तपासून पाहणं अत्यावश्यक आहे. राजकारणात फोटो एडिटिंग, बनावट आरोप, आणि चुकीची माहिती पसरवण्याचं नवं शस्त्र वापरलं जात आहे. पण सत्य शोधण्याऐवजी अफवांवर विश्वास ठेवणं, समाजासाठी आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. यशोमती ठाकूर यांची भूमिका या प्रकरणात ठाम आणि स्पष्ट आहे की खोट्या प्रचाराचं खंडन होणं आवश्यक आहे. अशा प्रकारांनी सत्य दडपण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ नये. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या रणधुमाळीत खरं कोणतं, हे नागरिकांनी ओळखायला हवं, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.