
महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्यासाठी ठाम भूमिका मांडणारे काँग्रेस आमदार नाना पटोले आता नागपूरच्या शांततेसाठी पुढे सरसावले आहेत. नागपुरातील दंगलीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी विधान सभेत नागपुरातील दंगलीच्या विषयावर सरकारच्या डोळ्यात अंजन घातले. सरकारने राज्याच्या विकासाच्या आणि सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. नागपूरमध्ये 17 मार्च रोजी घडलेल्या दंगलीच्या घटनेबाबत विधानसभेत सखोल चर्चा व्हावी, अशी मागणी आमदार पटोले यांनी केली आहे.
नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात शांतता आणि सामाजिक समरसता टिकून राहावी, यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या घटनेमुळे नागपूरमधील नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. यावर योग्य पद्धतीने चर्चा व्हावी. तातडीने आवश्यक निर्णय घेतले जावे, असे आमदार नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Prakash Ambedkar : जातीय हिंसेशिवाय भाजप-आरएसएसचे अस्तित्व शक्य नाही
सौहार्द गरजेचे
महाराष्ट्र हा सर्वसमावेशकतेचा आणि सहिष्णुतेचा वारसा जपणारा प्रदेश आहे. महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्याचा आदर्श देशभर मानला जातो. अशा परिस्थितीत, नागपूरसारख्या शहरात शांततेस बाधा आणणाऱ्या कोणत्याही घटनेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र घ्यावे. निर्णयक्षम चर्चा करावी. उपाययोजना सुचवाव्यात, असे नाना पटोले म्हणाले.
राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांनीही तत्परतेने कारवाई केली आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात अशा घटनांना आळा घालण्यासाठी संवाद होणे गरजेचे आहे. याशिवाय दीर्घकालीन उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती बिघडत जाईल, असेही पटोले म्हणाले.
कारवाई गरजेची
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता आणि सुव्यवस्था महत्त्वाची आहे. समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागावे. त्यातून अशा घटनांना प्रतिबंध करता येईल. नागपूरच्या घटनेवर चर्चा करताना, भविष्यात अशा प्रसंगांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तंत्रज्ञान, धोरण आणि जनजागृती यांचा प्रभावी उपयोग करण्याची गरज पटोले यांनी अधोरेखित केली.
लोकशाहीत संवाद विकासाचा आधारस्तंभ आहे. नागपूरच्या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली, ही बाब महत्त्वाची आहे. तरीही दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे. त्यमुळे आणखी प्रभावी निर्णय घ्यावे लागतील. समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे. सकारात्मक चर्चा करावी. अधिक सुरक्षित, स्थिर आणि शांततामय महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्यावे, असेही आमदार नाना पटोले म्हणाले.
Manisha Kayande : सरकारी वीजनिर्मिती थंड, खासगी मात्र धगधगती
सामूहिक जबाबदारी
महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक नेत्याने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी काहींना आळा घालावा लागेल. नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्य गरजेचे आहे. नागपूर दंगलीतील खऱ्या दोषींविरुद्ध कारवाई करणे गरजेचे असल्याचेही नाना पटोले म्हणाले.