
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. सगळ्यांना आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हटावचे वेध लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत यश आणि विधानसभा निवडणुकीत अपयश अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. या पराभवाचं खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडण्यात आलं आहे. त्यामुळं नाना पटोले यांनी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी पदाचा राजीनामा सादर केला आहे. आता त्यांचा राजीनामा मंजूर करीत नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा तेवढी बाकी आहे. नाना पटोले यांना आता विधानसभेचे गटनेता पद हवे आहे. अद्याप काँग्रेसकडून गटनेता निवडण्यात आलेला नाही. त्यामुळं नानांनी या पदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र पटोले यांना गटनेता पद मिळणार नाही, याचे प्रयत्न सुरू आहेत. नाना पटोले निव्वळ एक आमदार म्हणून कार्यरत राहावे, असा अनेकांना प्रयत्न आहे. त्याला दिल्लीमधूनही अनेक नेत्यांची साथ मिळत आहे. त्यामुळं काँग्रेसचं गटनेता पद नानांना मिळणार का? याबद्दल साशंकता आहे.
विधानसभा अध्यक्ष असताना नाना पटोले यांची अचानक राजीमाना दिला होता. तत्कालीन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची विकेट घेण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचा आरोप आता होत आहे. भाजपच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून भाजपच्या एका नेत्याची फिल्डिंग लावण्यासाठी हा राजीनामा पटोले यांनी दिल्याचा आरोप काँग्रेसमधून होत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर पटोले यांच्यावरील हे सगळे आरोप पुसले गेले. एकाएकी पटोले मुख्यमंत्री पदाचे दावेदार झालेत. महाविकास आघाडीची सत्ता येणार अन् पटोलेच मुख्यमंत्री होणार असं चित्र राज्यात निर्माण झालं. मात्र नशिबानं पटोले यांची साथ दिली नाही. काँग्रेसला निवडणुकीत जबर फटका बसला.

जबाबदारी घेणार
यशाचे श्रेय जो घेतो त्यालाच अपयशाचे श्रेयही घ्यावं लागतं. काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त करीत पटोले यांच्यावर पहिला बॉम्बहल्ला केला. त्यानंतर तर पटोले यांच्या विरोधात आरोपांची मालिकाच सुरू झाली. पटोले यांच्याच हेकेखारीमुळं जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला. जागा वाटपाच्या बैठकीला कोणीही गंभीरतेने घेतलं नाही. दहा वाजताची वेळ असताना दोन वाजता बैठकीला येणं हे सगळे मुद्दे आता चर्चेला येत आहेत. त्यामुळं भाजपनंच तर नाना पटोले यांना काँग्रेसमध्ये पेरंल नाही ना, असा संशय आता व्यक्त केला जात आहेत. या संशयातून आणि भविष्यातील धोका पाहता आता राहुल गांधी यांना विदर्भातील नेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नको आहे. त्यामुळं विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांनाही या पदाला मुकावं लागणार आहे.
प्रदेशाध्यक्ष पद गेलं तरी आता नाना पटोले यांना विधान सभेत गटनेता म्हणून काम करण्याची ईच्छा आहे. त्यासाठी ते आता सरसावले आहेत. त्यातून काँग्रेसच्या गटावर राज्य करणं आणि नियंत्रण ठेवणं हाच उद्देश पटोले यांचा दिसत आहे. असं झालं तर विधानसभेतील काँग्रेसची लगाम पटोले यांच्या हातीच राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदापेक्षा हे पद केव्हाही महत्वाचं आहे. पटोले गटनेते झाल्यास कदाचित महायुती सरकार काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद देऊ शकते. निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता पद मिळावं, अशी विनंती महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पटोले गटनेता झाले तर कदाचित ‘देवा’ची कृपा होईल. या कृपेतून पटोले यांना विरोधी पक्षनेते पदही मिळण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
सत्ता नसताना खर्च वाढविणाऱ्या प्रदेशाध्यक्ष पदापेक्षा पटोले यांना विरोधी पक्षनेता पद केव्हाही परवडणारे आहे. मुख्यमंत्र्यांच्या समकक्ष दर्जा, व्हीआयपी सुरक्षा अन् बरंच काही यातून पटोले यांना मिळू शकते. त्यामुळं पटोले यांनी आधीच प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी दर्शविली आहे. राजीनामाही देऊन टाकला आहे. रुपेरी पडद्यावर शाहरूख खान याचा एक चित्रपट पूर्वी बराच गाजला होता. त्यात शाहरूखचा एक डॉयलॉग होता. ‘हार कर जितने वाले को बाजीगर कहते है’ असं तो त्या डॉयलॉगमध्ये म्हणतो. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष पद गमावून विरोधी पक्षनेता पद मिळवून पटोले बाजीगर ठरू शकतात.