
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका करत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. वादळ उसळताच काँग्रेसने आपल्या नेत्यांना शिस्तीचे आदेश जारी करत गप्प राहण्याचा इशारा दिला.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ झाला आणि भाजप-काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दिवसभर सोशल मीडियावर ‘पोस्टर वॉर’ रंगले. त्यानंतर काँग्रेसने आपल्या नेत्यांना अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
काँग्रेसने त्यांच्या अधिकृत X हँडलवर 28 एप्रिल रोजी एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये कुर्ता-पायजमा घातलेला एक माणूस दाखवण्यात आला होता. परंतु त्याचे डोके आणि हात-पाय गायब होते. या फोटोखाली ‘जिम्मेदारी के समय गायब’ असे खळबळजनक कॅप्शन दिले होते. या इशाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली. कारण पहलगाम हल्ल्यानंतर 24 एप्रिल रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीस मोदी अनुपस्थित होते. काँग्रेसने स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, देश संकटात असताना पंतप्रधानांनी स्वतः हजर राहून जबाबदारी घ्यावी.

आरोप – प्रत्यारोपांचा भडका
काँग्रेसच्या या पोस्टवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. भाजपकडून काँग्रेसवर सडकून टीका करण्यात आली. भाजपने म्हटले, काँग्रेस आणि दहशतवाद्यांची विचारसरणी सारखीच आहे. काँग्रेस म्हणजे लष्कर-ए-पाकिस्तान, पाकिस्तानची धोरणं ‘सर तन से जुदा’ वाली. राहुल गांधींच्या इशाऱ्यावरून हे सर्व चालते आहे. पाकिस्तानच्या टॉवरवरून काँग्रेसला सिग्नल मिळतो आणि तिथे कौतुक मिळवण्यासाठीच ही चाल आहे. भाजप प्रवक्ते आर. पी. सिंह यांनी काँग्रेसवर टीकेचा प्रतिहल्ला करत एक फोटो पोस्ट केला, ज्यात राहुल गांधींसारखा दिसणारा एक व्यक्ती पांढऱ्या टी-शर्ट आणि गांधी टोपीत दाखवण्यात आला होता. त्याच्या मागे चाकू धरण्याचा इशारा देण्यात आला आणि ‘पाकिस्तानचे मित्र’ असे कॅप्शन लिहिले होते. त्यामुळे सोशल मीडियावर राजकीय युद्ध पेटले.
प्रकरण वाढू लागल्यानंतर काँग्रेसने त्वरित कारवाई करत पक्षातील नेत्यांसाठी एक परिपत्रक जारी केले. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी हे परिपत्रक जारी करत सर्व पदाधिकाऱ्यांना सावधगिरी, संयम आणि शिस्त पाळण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षाच्या वतीने केवळ अधिकृत नेतेच वक्तव्य करतील, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. जर कोणत्याही नेत्याने या नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा वेणुगोपाल यांनी दिला. तसेच, सर्व प्रवक्ते, पॅनलिस्ट आणि सोशल मीडिया टीमने 24 एप्रिल 2025 रोजी काँग्रेस कार्यकारिणीने मंजूर केलेल्या ठरावानुसारच भूमिका मांडावी, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
राजकीय संघर्ष
काँग्रेसने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या नेत्यांसाठी जे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. सर्वप्रथम, देश एका गंभीर आणि दुःखद प्रसंगातून जात असताना काँग्रेसने एकता, जबाबदारी आणि परिपक्वता दाखवावी, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, कोणतेही असंविधानिक विधान किंवा अधिकृत मार्गापासून दूर जाणारे वक्तव्य हे पक्षशिस्तीचे उल्लंघन मानले जाईल आणि त्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. तिसऱ्या मुद्द्यात, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. या प्रकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, ही प्रत्येक भारतीय नागरिकाची भावना असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
Prakash Ambedkar : पंतप्रधानांना लष्करी परवानगी द्यायचा अधिकार नाही
पहलगाम हल्ल्यानंतर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी, अशी देशवासीयांची अपेक्षा असताना, भाजप व काँग्रेसमधील पोस्टर वॉर आणि आरोपांची साखळी पाहून सामान्य नागरिक संभ्रमात पडला आहे. या दु:खद घटनेवर एकजुटीने प्रतिसाद देण्याची गरज असताना, राजकारणाने पुन्हा एकदा केंद्रस्थानी स्थान घेतले आहे.