
तीन वर्षांपासून महानगरपालिका निवडणुक न झाल्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हातात आहे. या प्रशासनराजविरोधात आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसने राज्यभर आंदोलन छेडले.
महाराष्ट्रातील महानगरपालिका सध्या भ्रष्टाचाराच्या चिखलात अडकल्या आहेत. भाजप सरकारने जनतेचा प्रतिनिधीच न निवडला जावा, यासाठी हा डाव आखल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शहरांमध्ये लोकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, पण प्रशासन मात्र निष्क्रिय आहे. नागरिकांच्या पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण आणि सुरक्षेसारख्या मूलभूत गरजा अपूर्ण राहिल्या असून, सत्ताधारी पक्ष सगळा भर हाताशी असलेल्या अधिकाऱ्यांच्या साहाय्याने भ्रष्टाचारात गुंतलेला आहे.
काँग्रेसने याला जोरदार विरोध करत आज संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आंदोलन छेडले. काँग्रेसच्या आरोपांनुसार, सरकार प्रशासनाला पुढे करून स्वतःची जबाबदारी झटकत आहे आणि जनतेला त्यांच्या समस्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. कोणत्याही लोकनियुक्त नगरसेवकांशिवाय महानगरपालिकांचे कारभार एका खास यंत्रणेच्या अधीन आहेत, जी सामान्य नागरिकांपेक्षा ‘वरच्या लोकां’चे हित पाहते.

विरोधकांचा हल्लाबोल
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राज्यभर महानगरपालिका प्रशासनाविरोधात काँग्रेसने आंदोलन छेडले. नाशिक, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार आणि जालना येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भ्रष्ट कारभार, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधांचा अभाव आणि शिक्षण क्षेत्रातील बेफिकिरीवर आक्रमक निषेध नोंदवला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन अधिक तीव्र झाले, तर जालना जिल्ह्यात ‘शेतकरी महाआक्रोश मोर्चा’ काढून सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली.
अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसने आंदोलन केले. माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंतराव वानखडे, आणि जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी सरकारच्या ‘शेतकरीहितैषी’ भूमिकेचा बुरखा फाडला. सरकार कर्जमाफी, वीजबिल माफी आणि नुकसानभरपाईच्या जाहिराती देते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कधीच मदत मिळत नाही, असा आरोप काँग्रेसने केला.
भ्रष्टाचाराच्या दलदलीत सरकार
काँग्रेसने संपूर्ण राज्यभर आंदोलन करून सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भाजप सरकार केवळ ‘फोटोसेशन’ आणि ‘विकासाच्या जाहिराती’ करत लोकांची दिशाभूल करत आहे, पण प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत, असा आरोप काँग्रेसने केला.
सरकारच्या या निष्क्रियतेवर जनतेतही असंतोष वाढत आहे. महानगरपालिका क्षेत्रात भ्रष्टाचार, दलाली आणि अपारदर्शक कारभार यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. काँग्रेसच्या आंदोलनानंतर सरकार काही सुधारणा करणार का, की जनतेला फक्त ‘स्वप्न दाखवणाऱ्या’ घोषणाच ऐकाव्या लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.