
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी माजी मंत्री बच्चू कडू अमरावती येथे उपोषणाला बसले आहेत. सगळीकडून त्यांना पाठिंबा मिळत आहेत. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्यांना पाठिंबा दिला.
अमरावतीमध्ये गुरुकुंज मोझरीच्या पवित्र भूमीत चाललेली ही एक राजकीय तपश्चर्या ठरते आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा, दु:खं आणि आत्महत्यांचा आक्रोश ऐकू येत नाही म्हणून माजी मंत्री बच्चू कडूंनी स्वतःच्या शरीरावर उपोषणाचा आघात केला आहे. आता या आंदोलनाला राजकीय बळ मिळालं आहे. अनेक संघटना कडू यांना पाठिंबा देत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मैदानात उतरून बच्चू कडूंना ठाम पाठिंबा दिला आहे. राजकारणाच्या नेहमीच्या संकुचित चौकटीतून बाहेर पडत, सपकाळ यांनी राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवत, शेतकरी वाचला तरच देश वाचेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहारचे संस्थापक व माजी मंत्री बच्चू कडू सध्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत असतानाही ते मागे हटलेले नाहीत. त्यांनी मांडलेले प्रश्न केवळ वैयक्तिक नव्हेत, ते शेतकऱ्यांच्या खोल जखमा आहेत. शेतमालाला मिळणारा अपुरा भाव, थकलेली कर्जमाफी, आत्महत्यांचा भयावह वाढता आकडा आणि सरकारी आश्वासनांचा फोल ठरलेला खेळ. बच्चू कडूंनी या साऱ्या प्रश्नांना स्वतःच्या आरोग्याचा वेठबिगार ठरवत देशासमोर उभं केलं आहे, असे सपकाळ म्हणाले.

बळीराजा त्रस्त
सडकून सहानुभूती व्यक्त करत नव्हे, तर रोखठोक राजकीय आवाजात सपकाळ म्हणाले, कडूंच्या मागण्या अचूक आहेत. शेतकरी आज पूर्णपणे कोलमडला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न केल्याने बळीराजा आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. काँग्रेस पक्षदेखील या लढ्याचं नेतृत्व करत आहेत. शेतकरी कर्जमाफी, नुकसान भरपाई आणि हमीभावाच्या मुद्यांवर राज्यभर आंदोलने सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली, पण ती कागदावरच राहिली. आजही हजारो शेतकरी बँकांच्या नोटिसांनी त्रस्त आहेत. हमीभाव हा शेतकऱ्याचा हक्क आहे, तडजोड नव्हे. या शब्दांत सपकाळ यांनी राज्य सरकारवर खरपूस टीका केली.
Yashomati Thakur : राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊ
संघर्ष पेटला
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे नमूद केलं की, काँग्रेस पक्ष केवळ समर्थनापुरता नाही, तर रस्त्यावर उतरून हा संघर्ष लढवणार आहे. सपकाळांनी अखेरच्या शब्दांत जनतेला भावनिक साद घातली. हा लढा कुणा एका पक्षाचा नाही. हा लढा आहे जगाच्या पोशिंद्याचा. बच्चू कडूंनी पेटवलेली ही मशाल आता विझू द्यायची नाही. सगळ्यांनी एकत्र यावं, शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं. बच्चू कडूंच्या अन्नत्यागाच्या आंदोलनाला आता जनतेसह राजकीय ताकदही मिळत आहे. काँग्रेसचा पाठिंबा म्हणजे या संघर्षाला मिळालेली एक मोठी ढाल. सरकारला आता प्रश्न टाळता येणार नाही. कारण आता शेतकरी पेटला आहे आणि त्याच्या मागे आता राजकीय वीजही आहे.