महाराष्ट्र

Amravati : शेतकऱ्यांच्या वेदनांचा ट्रॅक्टर घेऊन काँग्रेस सत्तेच्या दारात

Congress : हक्कांसाठी जिल्हाधिरी कार्यालयावर दिली धडक

Author

शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी काँग्रेसने अनोखे आंदोलन करत अमरावतीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी अधिकाऱ्यांनी रस्त्यातच मोर्चा थांबवत सभा घेतली.

शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांच्या प्रश्नांची गंभीरता आणि सरकारच्या उदासीन धोरणांवर तीव्र आवाज उठवत काँग्रेसने अनोख्या शैलीत संघर्षाचा बिगुल फुंकला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या अनोख्या ट्रॅक्टर मोर्चातून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारा इशारा दिला.

या आंदोलनामध्ये जिल्हाभरातील 400 हून अधिक ट्रॅक्टर आणि इतर वाहने सहभागी होती. शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात केली. तासनतास चाललेल्या या मोर्चामध्ये शासनविरोधी घोषणा, विविध मागण्यांचे फलक, आणि शिस्तबद्ध जनसमुदाय पाहायला मिळाला. पोलिस प्रशासनाने मोर्चाची तीव्रता लक्षात घेऊन 200 फूट आधीच त्याला अडवले आणि त्याठिकाणीच एक छोटेखानी सभा पार पडली.

मुख्य मागण्या

मोर्चात फक्त कर्जमाफीच नव्हे, तर इतर महत्वाच्या मागण्यांनाही प्राधान्य देण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांना नियमित आणि सवलतीच्या दरात वीजपुरवठा, शेतमालाला किमान आधारभूत दर (एमएसपी), नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तत्काळ भरपाई मिळावी. सरकारी शेतमाल खरेदी केंद्रांची स्थापना, आत्महत्याग्रस्त भागांत मानसिक आरोग्य केंद्रांची उभारणी, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षण व नोकरीत आरक्षण यांचा समावेश होता. तसेच नाफेडमार्फत ज्वारी खरेदीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचाही आग्रह धरला गेला.

Prakash Ambedkar : स्थानिक निवडणुकीसाठी वंचित आघाडीची संघटनात्मक कमांड

राज्याच्या सत्तेवर असलेल्या भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादी (अजित पवार) महायुती सरकारवर काँग्रेसने जोरदार टीका केली. त्यांनी निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजावाजा करून आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येताच ती आश्वासने पायदळी तुडवण्यात आली. त्यामुळेच काँग्रेसने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्षाची मशाल पेटवली असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे खासदार बळवंतराव वानखडे, माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी ठाम शब्दांत सरकारला धारेवर धरले. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून कर्जमाफीसह अन्य मागण्यांचा ठोस पाठपुरावा करण्यात आला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!