
राज्यात राजकीय नाट्याचा नवीन अंक सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे गट एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरले असतानाच काँग्रेसने ठामपणे आपली भूमिका मांडत राजकारणाला नवे वळण दिले आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यासंदर्भातील चर्चांनी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार त्यांनी म्हटले आहे की, कुणी कुठे गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचा जनाधार ठाम आहे आणि राहील, असा ठाम विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी एका मुलाखतीत ‘भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये,’ असे विधान केले. या विधानानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल, असे सांगून या चर्चांना आणखी बळ दिले आहे. परिणामी, राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता अधोरेखित होत आहे.

Nagpur : रस्ता उघडायचा होता, पण न्यायालयाचा दरवाजा आधी उघडला
कुणीही जाऊदे
या घडामोडींवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, कुणी कुठे गेले तरी काँग्रेसला काहीही फरक पडणार नाही. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारा आणि पक्षाशी निष्ठावान असलेला जनाधार आमच्यासोबत कायम राहणार आहे. त्यामुळे आमचा पाया अधिक मजबूत होत आहे. वडेट्टीवारांनी भाजपच्या रणनीतीवरही जोरदार टीका केली. नेते वापरा आणि फेकून द्या हेच भाजपचे धोरण आहे. एखाद्या पक्षाचा वापर करून दुसरा पक्ष सोबत घ्यायचा हे त्यांचे नवे तंत्र आहे. भाजपचा खरा उद्देश म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसला कमकुवत करून प्रादेशिक पक्षांकडे जनमत वळवणे. नंतर ते प्रादेशिक पक्षही संपवणे, असे वडेट्टीवार म्हणाले.
भाष्य करण्यास नकार
शरद पवारांच्या भूमिकेवर बोलण्याचे टाळत वडेट्टीवार म्हणाले, पवार साहेबांची भूमिका काय आहे हे त्यांनाच विचारले पाहिजे. मात्र, संपूर्ण राजकीय चित्र हे भाजपच्या डावपेचाचा भाग आहे हे स्पष्ट आहे. काँग्रेसला कमजोर करून लोकशाहीला गालबोट लावण्याचा हा डाव आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जबरदस्त टीका करताना म्हटले की, भाजप काँग्रेसमुक्त भारताचा नारा देत होता, पण आज परिस्थिती अशी आहे की भाजप स्वतः काँग्रेसयुक्त झाला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते फोडण्याचे खुले आवाहन भाजपकडून होते, पण अजूनही काँग्रेस संपलेली नाही आणि जनतेच्या मनात आमचा विश्वास टिकून आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींना पाहता, राष्ट्रवादीचे गट एकत्र येतात की नाही हे येणारा काळच सांगेल. मात्र, काँग्रेसचा विश्वास, स्पष्ट भूमिका आणि सत्तेवर नाही तर विचारांवर आधारित लढण्याची तयारी स्पष्टपणे दिसून येत आहे. काँग्रेससाठी ही स्वच्छता मोहीम ठरणार का, आणि भाजपच्या ‘डावपेचां’ना शह देणारी भूमिका कशी आकार घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.