
धर्मवादाच्या मुद्द्यावर नेहमीच वादळ निर्माण करणारे नीतेश राणे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या ‘धर्म विचारून खरेदी करा’ या विधानावर विजय वडेट्टीवारांनी जहाल टीका केली आहे.
धर्मवादाच्या वादळात स्वतःची राजकीय नौका हाकणारे राज्याचे मंत्री नीतेश राणे हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ‘धर्म विचारून खरेदी करा’ असा सल्ला देणाऱ्या राणेंवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच हल्ला चढवला आहे. देशात आणि राज्यात जातीयतेचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये दोन जातींना एकमेकांसमोर उभं केलं जात आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा ‘साडेचार फुटांचा’ मंत्री लोकांना धर्म विचारून दुकानातून वस्तू खरेदी करा, असा सल्ला देतो आहे. हे अत्यंत धोकादायक आहे, अशा शब्दांत वडेट्टीवारांनी नीतेश राणेंवर चांगलाच निशाणा साधला.
दापोलीतील एका सभेत बोलताना नीतेश राणे यांनी हिंदू नागरिकांना असा सल्ला दिला की, दुकानदाराकडून काही खरेदी करताना त्याचा धर्म विचारावा, आणि जर शंका आलीच तर त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावावे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधानाचा निषेध करताना वडेट्टीवारांनी टोला लगावला की, हाच का तुमचा विकासाचा अजेंडा?

अतिरेकी सापडत नाहीत
वडेट्टीवार इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी केंद्र सरकारवर अन्य मुद्द्यांवरूनही घणाघाती टीका केली. या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. त्यांना 10 दिवस झालेत, तरी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यातील आरोपी सापडलेले नाहीत. अतिरेक्यांचे कपडे सापडतात, लोकेशन मिळतं, पण अतिरेकी सापडत नाहीत, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका करत त्यांनी सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भाषणात वडेट्टीवारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केलं. जर हे दोन भाऊ एकत्र येत असतील, तर त्यांनी सर्वधर्म समभाव घेऊन यावं. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेले विचार पुढे घेऊन ते राजकारण करावं. असे घडलं, तर आम्ही स्वतः त्यांचा सत्कार करू, असे उद्गारही त्यांनी काढले.
Maharashtra : शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बनतील गार्डियन्स
नीतेश राणे यांच्यासारख्या नेत्यांचे धर्माधिष्ठित विधान हे केवळ धार्मिक भावना चाळवणारे नाहीत. समाजामध्ये फूट पाडणारे असल्याचे आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहेत. विजय वडेट्टीवारांच्या आक्रमक शैलीतील प्रतिक्रिया हे दर्शवते की, विरोधक आता अशा विधानांवर थेट आणि धारदार भाषेत प्रतिउत्तर देऊ लागले आहेत.
राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा धर्म आणि जात यांचं राजकारण उफाळून येतंय. पण या ध्रुवीकरणाच्या खेळात खरेच कोण जिंकणार आणि समाजाचे काय होणार? हा खरा प्रश्न आहे. ही राजकीय वादळं शमतायत की आणखी पेटणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.