
राजापूरच्या घटनेवरून ॲड. यशोमती ठाकूर यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आरोप करत, त्यांनी फडणवीस व नितेश राणेंना थेट लक्ष्य केले आहे.
राजकारणात नेहमीच तडफदार आणि परखड भूमिका घेणाऱ्या काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांनी राजापूरच्या घटनेवरुन भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांच्या राजकीय गटाला अशांतता पसरवणारी टोळी असे संबोधले आहे. विशेषतः भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधत, हे लोक समाजात द्वेष आणि तणाव वाढवण्यासाठीच पुढे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ठाकूर यांच्या या परखड टीकेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, फक्त रस्ते बांधून आणि कारखाने उभारून प्रगती होत नाही. सामाजिक सलोखा टिकवणे हे खऱ्या प्रगतीचे लक्षण आहे. मात्र, फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जातीय तेढ निर्माण करण्याचे कटकारस्थान रचत आहे.

सामाजिक विद्वेषाचे कटकारस्थान
राजापूरमध्ये शिमगोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान मशिदीच्या पायऱ्यांवर होळी टेकवण्याच्या वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. हा तणाव पोलिसांनी नियंत्रित केला असला तरी, या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर गरमागरम चर्चा सुरू आहे. ठाकूर यांनी या घटनेचा संदर्भ घेत फडणवीसांवर थेट आरोप केला आहे की, भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जातीयवाद आणि धार्मिक संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात दरी निर्माण करून निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरणाचा डाव आखला जात आहे. ठाकूर यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
सामाजिक सौहार्दाचे मारेकरी
ठाकूर यांनी नितेश राणेंवर थेट निशाणा साधत त्यांना “मूर्ख” असे संबोधले आहे. त्यांनी म्हटले की, नितेश राणे यांना सामाजिक शांततेशी काहीही देणे-घेणे नाही. अशा माणसांना केवळ अशांतता पसरवण्यासाठीच भाजपमध्ये स्थान दिले गेले आहे. त्यांनी पुढे असा दावा केला की, फडणवीस आणि भाजपच्या गटाने ठरवून अशा नेत्यांना पुढे आणले आहे, जे केवळ भडकावू वक्तव्ये करत समाजात दुही पसरवतात. यामुळे भाजपचा खरा चेहरा समोर येत असून, ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत.
संतभूमीतील लांच्छन
महाराष्ट्राची ओळख ही संत, विचारवंत आणि सामाजिक ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, भाजपच्या राजवटीत सतत समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, असे सांगत ठाकूर यांनी भाजपला इशारा दिला की, जनतेने याचे उत्तर लवकरच निवडणुकीत देईल. त्यांनी सरकारला आव्हान दिले की, राजकारण करताना समाजाच्या शांततेला गालबोट लागू न देता जबाबदारीने वागावे. अन्यथा, लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या सरकारला जनता माफ करणार नाही. या आक्रमक विधानांमुळे ठाकूर आणि भाजपमध्ये आणखी शाब्दिक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. भाजपकडून या आरोपांना प्रत्युत्तर येईल की त्यावर मौन बाळगले जाईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.