भारताच्या शेजारील नेपाळमध्ये सध्या अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात गोंधळ माजला आहे. या गोंधळाचा परिणाम भारतावरही होईल का, हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे.
नेपाळमधील आगडोंब आता भारताच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे का? हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळच्या रस्त्यांवर उतरलेल्या तरुणांनी जणू क्रांतीची मशाल पेटवली. संसद, राष्ट्रपती भवन पेटत असताना नेपाळमधील राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले. पंतप्रधान लष्कराच्या कवचाखाली कुठेतरी पळाले, पण त्यांचा ठावठिकाणा गुलदस्त्यात आहे. या अभूतपूर्व उद्रेकाने नेपाळमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पण ही आग आता भारतातही पसरण्याचा धोका आहे का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
भारतातही नेपाळसारखी अराजकता पसरवण्याचा डाव काही जण रचत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेल्या शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा इशारा दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतातही नेपाळसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली होती. यावर शिंदे यांनी ठणकावून सांगितले, भारताची लोकशाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने बळकट आहे. अशा प्रकारची अराजकता इथे कधीच शक्य नाही. त्यांनी राऊत यांच्या वक्तव्याला ‘दुर्दैवी’ ठरवत, देशप्रेमी नागरिक असे विधान करू शकत नाहीत, असे सुनावले.
Akola Police : धर्मांतर प्रकरणाने अंधार सांगवीत तणावाचे वारे
संविधानाची ताकद
काही मंडळी जाणीवपूर्वक देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कट रचत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे ते म्हणाले. शिंदे यांनी भारताच्या लोकशाहीच्या सामर्थ्याचा गौरव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारताची लोकशाही अजेय आहे. काही लोकांना जनतेच्या मतांवर निवडून येण्याची हिंमत नाही, म्हणून ते अराजकतेचा मार्ग अवलंबतात. पण भारतात असा डाव यशस्वी होऊ शकत नाही, असे त्यांनी ठणकावले. त्यांनी पुढे सांगितले की, देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शासन व्हायला हवे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिंदेंचा हा थेट इशारा नेपाळच्या घटनेचा भारतात गैरवापर होऊ नये, यासाठी आहे. दिल्लीतील शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने शिंदे यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचेही कौतुक केले. राधाकृष्णन यांचा शपथविधी हा एनडीए आणि देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांचा साधा स्वभाव, उच्च विचार आणि प्रदीर्घ अनुभव यामुळे उपराष्ट्रपतीपदाचा मान वाढेल, असे शिंदे म्हणाले. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही उत्तम काम केले होते. आता उपराष्ट्रपती म्हणून ते देशाच्या प्रगतीत मोलाची भर घालतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र लकी आहे, आता राधाकृष्णनही लकी ठरले, असे म्हणत त्यांनी हलक्या-फुलक्या शैलीत वातावरण हलके केले.
C.P. Radhakrishnan : माजी राज्यपालांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ
नेपाळच्या आगीची ठिणगी भारतात पडू नयेत, यासाठी शिंदे यांनी दिलेला इशारा आणि त्यांचे देशभक्तीचे आवाहन यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भारताच्या लोकशाहीचा गौरव करताना त्यांनी स्पष्ट केले की, देशाचा कणा मजबूत आहे. कोणत्याही कारस्थानाला यश मिळणार नाही. आता प्रश्न उरतो, नेपाळच्या घटनेचा भारतावर कितपत परिणाम होईल?
