
विदर्भातील आश्वासनाच्या वाळवंटात रेल्वेच्या ट्रॅकने हिरवाईचं स्वप्न आणल आहे. कोट्यवधींच्या या रेल्वे प्रकल्पामुळे विदर्भाच्या प्रगतीला रुळ लाभणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्राने झपाट्याने प्रगती केली, तर विदर्भ मात्र नेहमीच मागे पडलेला दिसतो. विकासाच्या आश्वासनांनी थकलेल्या या भागाला अनेकदा केवळ गाजर दाखवले गेले. वेळोवेळी बदलत्या सरकारांकडून योजनांची घोषणा झाली, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत विदर्भाला मिळाली ती केवळ प्रतीक्षा आणि निराशा. विदर्भात औद्योगिक क्षेत्रांची कमतरता ही विकासाची मंद गती दर्शवते. औद्योगिक प्रगतीच्या बाबतीत हा भाग आजही मागे आहे.
विदर्भात प्रवासी वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या, स्थानिक उत्पादनांची बाजारात पोहोच मर्यादित, आणि सर्वात मोठं दुखणं म्हणजे शेतकऱ्यांचं. त्यांच्या समस्या ऐकूनही दुर्लक्षित केल्या गेल्या. शासनासाठी अनेकदा विदर्भ हा फक्त निवडणुकीपूर्वी आठवला जाणारा विषय ठरतो का? असा प्रश्नही अनेकदा नागरिकांनी उपस्थित केला. इथल्या जनतेनं नेहमीच विकासाची आस धरली, पण हातात राहिलं ते फक्त आश्वासनांचं वाळूत रेखाटलेलं चित्र. परंतु आता, या संपूर्ण चित्रात बदल घडवणारी एक निर्णायक घोषणा समोर आली आहे.

रेल्वे मार्गिका
आता मात्र या अपेक्षांना चालना देणारा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच घोषणा केली की, तब्बल तीन हजार 399 कोटी खर्चाच्या भव्य रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. रतलाम ते नागदा दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका, तसेच वर्धा ते बल्हारशहा दरम्यान चौथी रेल्वे मार्गिका उभारली जाणार आहे. एकूण 173 किमी लांबीचा हा रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांतील विकासाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.
Prashant Padole : शेतकऱ्यांच्या थट्टेवर भडकले काँग्रेस खासदार
अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, हा प्रकल्प प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. कोळसा, सिमेंट, जिप्सम, फ्लाय अॅश, कंटेनर्स, कृषी उत्पादनं आणि पेट्रोलियम अशा मालवाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरेल. या मार्गांमुळे वाहतूक अधिक जलद, सुरक्षित व कार्यक्षम होणार आहे, ज्यामुळे स्थानिक उद्योगांनाही नवे बळ मिळेल.
गाड्यांचा खोळंबा होणार दूर
आजवर विदर्भाच्या रेल्वे मार्गिका मुख्यतः एकाच ट्रॅकवर चालणाऱ्या होत्या. परिणामी, अनेकदा मालगाड्यांना प्राधान्य दिलं जात होतं आणि प्रवासी गाड्यांचा खोळंबा होत असे. पण आता तिसरी व चौथी मार्गिका झाल्यास प्रवाशांचीही अडचण दूर होणार आहे. विशेष म्हणजे, वर्धा ते बल्हारशहा हा मार्ग हा नागपूर – चंद्रपूर – बल्लारपूर – माजरी – सिरसगाव अशा खाण पट्ट्यातून जातो. त्यामुळे येथे कोळसा वाहतुकीसह रोजगाराचंही मोठं संधीचं द्वार खुले होणार आहे.
UPSC Fraud : सत्य सिस्टीम हरवली, सिव्हिल सेवांमध्ये खोट्यांची एन्ट्री
या निर्णयामुळे केवळ रेल्वे नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची जलद वाहतूक करणे शक्य होईल. गोडाऊन, लोडिंग यार्ड्स, सहाय्यक उद्योगांची निर्मिती, स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, हे सर्व या प्रकल्पाच्या परिणामी घडू शकतं, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष आभार मानले. विदर्भाने खूप सहन केलंय. इथल्या मातीत ताकद आहे, पण संधी मिळाली नाही. आज जेव्हा विकासाचे रस्ते, रेल्वेचे ट्रॅक निर्माण होत आहेत, तेव्हा ही फक्त सुरुवात मानावी लागेल. पुढील काही वर्षांमध्ये जर हे प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले, तर विदर्भाच्या नशिबाची दिशा नक्कीच बदलेल.