महाराष्ट्र

Devendra Fadnavis : जिथं पोहोचला नाही विकास, तिथून सुरू नवा ध्यास 

Wardha : फक्त राजकारण नाही, स्वप्नांचं सत्य करण्यासाठी आलोय 

Author

खूप वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या वर्धा आणि विदर्भासाठी आता आशेची पहाट उजाडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इथून सुरू होतेय विकासाची नवी क्रांती.

राजकारण नव्हे, विकास हेच माझं धोरण आहे, अशी ठाम भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातून एक महत्त्वपूर्ण विकास पर्वाची घोषणा केली. आर्वी येथून बोलताना त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी वर्षभर 12 तास मोफत वीज देण्याची ग्वाही दिली. वर्धा जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात सिंचन, उद्योग आणि रोजगाराच्या संधी खुल्या करत ‘विकासाची वीज’ जनतेपर्यंत पोहोचवली.

वर्धा येथे 720 कोटींच्या 11 विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. या मंचावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी ग्रामीण भागाचा विकास, औद्योगिक गुंतवणूक, सिंचन योजनेची गती, शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि लॉजिस्टिक केंद्र निर्माण यांची महत्त्वपूर्ण घोषणा केली. डिसेंबर 2026 अखेर राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाला 12 तास मोफत वीज दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. राज्यातील कृषी क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय उघडला. वीजबिलही दरवर्षी कमी करत नेणार आहोत. सौर ऊर्जेचा लाभ मध्यमवर्गीयांपर्यंत नेऊन 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणार आहोत, असं सांगत त्यांनी स्वयंपूर्णतेचा नवप्रकाश दाखवला.

लॉजिस्टिक्स हब 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की लोअर वर्धा प्रकल्प व वाढोणा-पिंपळखुटा उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित होणार. या भागात शेतीसाठी मुबलक पाणी आणि वीज पुरवली जाईल. लोअर वर्धा प्रकल्पावर 500 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता निर्माण केली जात आहे. जी या भागाला वीजस्वयंपूर्ण करेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर, समृद्धी महामार्गावरील ‘विरुळ नोड’ येथे एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. यामुळे वर्धा औद्योगिकदृष्ट्या एक नवा केंद्रबिंदू ठरणार आहे. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी झालेल्या 16.5 लाख कोटींपैकी सात लाख कोटींची गुंतवणूक केवळ विदर्भासाठी आहे. वर्ध्याचा मोठा वाटा यात असेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Bhandara Sand Mafiya : कोथुर्णा खंबाटा गावातून वाळू तस्करीचा रहस्यमय मार्ग

वर्धा सज्ज

सिंदी येथे उभारण्यात येणारा ड्रायपोर्ट, वर्धा मार्गे जाणारा ‘शक्तीपीठ महामार्ग’, आणि एमआयडीसी नोड्समुळे वर्धा हा मध्य भारतातील महत्त्वाचा लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होईल. ही योजना केवळ विकास नव्हे, तर स्थानिक तरुणांसाठी हजारो रोजगाराची संधीही घेऊन येईल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आर्वी शहरातील नवीन प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालयाची 100 खाटांची नवीन इमारत, गांधी विद्यालयाची इमारत, स्विमींग पूल, रस्ते, तलाव संवर्धन, व सौरग्राम प्रकल्प अशा 10 विकास प्रकल्पांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, राज्यातील 476 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2025 रोजी होईल. यात आर्वीमधील तीन शाळांचा समावेश आहे.

कोट्यवधींचा ऐतिहासिक महाप्रकल्प

वर्ध्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांमध्ये समृद्धीचे पाणी वाहण्यासाठी गोसीखुर्द धरणाच्या सांडव्याद्वारे 550 किलोमीटर लांबीची नदी निर्माण केली जाणार आहे. 62 टीएमसी पाण्याची वाटचाल करणारा हा नदीजोड प्रकल्प एक लाख कोटी रुपयांच्या तरतुदीने साकारला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वर्धा जिल्हा केवळ विकासाच्या योजनांचा केंद्रबिंदू नसून, विदर्भाच्या औद्योगिक, कृषी व सामाजिक उत्कर्षासाठी आधारस्तंभ बनत आहे. ‘विकास म्हणजे केवळ घोषणांचा पाऊस नाही, तर ठोस अंमलबजावणीचा वीज प्रवाह आहे’ हे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. विकासाच्या या प्रवाहात वर्धा जिल्हा वेगाने पुढे सरकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हा या वाटचालीचा खरा प्रकाशस्तंभ ठरत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!