
‘वेव्ह्स समिट 2025’ मध्ये महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक रेल्वे प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत राज्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
देशाच्या रेल्वे क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असताना, महाराष्ट्रासाठी ही एक सुवर्णसंधी ठरत आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये सुरु असलेल्या ‘वेव्ह्स समिट 2025’ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला. या विशेष समारंभात महाराष्ट्रासाठी अनेक महत्त्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या रेल्वे प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री वैष्णव यांनी वेगवेगळ्या ऑडिटोरियम्सची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी ऐतिहासिक घोषणा करण्यात आल्या. फडणवीस पुढे म्हणाले, “राज्यात एकूण एक लाख 73 हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. यामध्ये फक्त मुंबई आणि परिसरात 17 हजार कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. फडणवीस पुढे म्हणाले, या प्रकल्पांतर्गत अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. राज्यातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या प्रयत्नांतून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. गाड्यांची कार्यक्षमता आणि वेगही लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

इतिहासाचा सफर
पत्रकार परिषदेत सर्वात मोठी आकर्षक घोषणा होती करण्यात आली ती म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज “सर्किट ट्रेन”. ही विशेष सर्किट ट्रेन महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले, सांस्कृतिक स्थळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख जागांशी जोडलेली असेल. या अद्वितीय रेल्वे टूरचा कालावधी 10 दिवसांचा असेल. जिथे प्रवाशांना एका भव्य हायकोलिक ट्रेनद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचा अनुभव घेता येणार आहे.
Nitin Gahdkari : ..तर रामदेव बाबांना नागपुरातच करावा लागेल योगा
फडणवीस यांनी विशेषतः विदर्भातील गोंदिया-बल्लारशा रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणासाठी मंजूर झालेल्या चार हजार 819 कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख केला. “ही रेल्वे लाईन विदर्भाला छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशशी अधिक मजबुतीने जोडणार आहे. या भागातील व्यापार, उद्योग आणि रोजगाराच्या संधींसाठी ही लाईन गेम चेंजर ठरणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गोंदिया हे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे. त्यामुळे बल्लारशा पासून तेलंगणा-आंध्र प्रदेशशी जोडणी होण्यामुळे ही लाईन अत्यंत धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते, असेही ते म्हणाले.
मोठा निधी महाराष्ट्राला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या योगदानाची माहिती देताना सांगितले की, या वर्षी रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रासाठी तब्बल 24 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. याआधी यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मिळालेला निधी 10 हजार कोटीचाही नव्हता. त्यांनी असंही नमूद केलं की, “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह राज्यातील सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहेत. हे सर्व स्थानक आधुनिक, स्वच्छ, प्रवासी-सुलभ आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवले जातील.
महाराष्ट्राला या समिटमधून रेल्वे क्षेत्रात नव्या विकासाचे दार खुले झाले आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांना या नव्या प्रकल्पांमधून लाभ होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी एकत्रितपणे यशस्वी प्रकल्प राबवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, येत्या काळात महाराष्ट्र देशाच्या प्रगत आणि स्मार्ट रेल्वे नेटवर्कमध्ये अग्रगण्य ठरणार असल्याचे संकेत दिले.