
बच्चू कडू यांच्या संयुक्त प्रयत्नातून दिव्यांगांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. रायगडच्या आंदोलनानंतर 19 मागण्या मंजूर होत एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला.
महाराष्ट्रातील झंझावाती आंदोलनकारी जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या आंदोलनशील नेतृत्वातून दिव्यांगांच्या हक्कांसाठी मोठं यश मिळवलं आहे. रायगड येथे दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीत बच्चू कडूंनी मांडलेल्या 22 मागण्यांपैकी तब्बल 19 मागण्या मंजूर करण्यात आल्या, हे एक ऐतिहासिक पाऊल ठरले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत अनेक ठोस निर्णय घेण्यात आले. जे केवळ दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठीच नव्हे तर सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहेत. या निर्णयांमध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्य, आर्थिक मदत, सन्मान आणि कर्जमाफी यांचा समावेश आहे. यामुळे दिव्यांगांचे जीवन अधिक सुलभ व सन्माननीय होईल.

Harshwardhan Sapkal : कुठे गेलेत सेलिब्रिटी? काँग्रेसचा संतापाचा पारा
दिव्यांग धोरण
2016 मधील कलम 88 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या एकूण अर्थसंकल्पातील किमान पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी या नियमाचे पालन होत नव्हते. यापुढे हा निधी खर्च होत आहे का, यावर लेखापरीक्षणाद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. यासोबतच दिव्यांग बचत गट व सहकारी संस्थांसाठी विशेष योजना आखली जाणार असून रोजगार, उद्योग, स्टॉल व्यवसायासाठी स्वतंत्र धोरण तयार केले जाणार आहे.
शिक्षण क्षेत्रातही दिव्यांगांसाठी मोठी सुधारणा करण्यात येणार आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर व अडथळामुक्त शिक्षण, मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी दहावी नंतर उच्च शिक्षणाची व्यवस्था आणि प्रत्येक विद्यापीठात संशोधन केंद्र उभारण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच वाहन परवाना मिळवण्यासंबंधी निर्देशही देण्यात आले आहेत.
प्रोत्साहन अनुदान
दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभांमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. उत्पन्न मर्यादा 50 हजार वरून थेट दोन लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय दिव्यांग व अदिव्यांग विवाहास प्रोत्साहन म्हणून दोन लाख 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकुल योजना, मयत दिव्यांग कुटुंबासाठी कर्जमाफी (सहा कोटींपेक्षा अधिक), आणि प्रमाणपत्र वाटप मोहिमेची सुरुवात तालुका व जिल्हास्तरावर केली जाणार आहे.
Amaravati Police : नागपूरच्या एनवायरो प्लांटमध्ये कोटींचा गांजा जाळून नष्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत अत्यंत सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्ण भूमिका घेतली. त्यांनी प्रशासनास यासंबंधी त्वरित अंमलबजावणीचे आदेश दिले. यामागे फडणवीस यांचा समवेदनशील दृष्टिकोन दिसून येतो. शासनाने ही भूमिका घेतल्याने हे आंदोलन यशस्वी होण्यास अधिक बळ मिळाले.
यशस्वी आंदोलन
बच्चू कडू यांनी याआधीही अनेक सामाजिक आंदोलनांद्वारे सरकार पुढे अनेक मुद्दे उपस्थित केले आहे. त्यांनी शिक्षक, शेतकरी, अपंग, विद्यार्थी आणि बेरोजगारांसाठी आंदोलने करून हजारो लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यांची आंदोलनशैली संयम, थेटपणा आणि जनहिताशी प्रामाणिकपणा दाखवते. त्यांचा लोकांवरील विश्वास आणि दबावराजकारणाची जाण या सर्वांनी मिळूनच हे दिव्यांग आंदोलन यशस्वी केलं.
यशामुळे दिव्यांगांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडेल. त्यांना केवळ योजना नव्हे, तर स्वाभिमान, आर्थिक स्वावलंबन आणि समाजात सन्मानाने जगता येईल. बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेला हा लढा महाराष्ट्राच्या लोकशाही इतिहासात एक प्रेरणादायी अध्याय ठरेल.