
अकोल्यावर पावसाचा जोर असतानाही, विकासाचे आश्वासक सूर लोकांच्या कानांवर पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोटींच्या प्रकल्पांसह महायुतीच्या भक्कम अजेंड्याची घोषणा केली.
पावसाच्या सरींच्या साक्षीने, आकाश काळवंडलेलं असताना अकोल्यात मात्र आश्वासनांचा प्रकाश झगमगत होता. अकोला क्रिकेट मैदानावर ‘विकास संवाद सभे’चं जंगी रूप पाहायला मिळालं. जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या फुलबाजारात घोषणांचा वर्षाव केला. आवाजात आत्मविश्वास, भाषणात पक्का आराखडा आणि जनतेला दिलासा देणाऱ्या संकल्पनांनी उपस्थितांचं मन जिंकून घेतलं.
मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं की, सर्वांगीण विकास हवा असेल, घरकुल, वीज, रस्ते, पाणी हवं असेल, शेतकऱ्यांना आश्वासक आयुष्य हवं असेल तर, लोकांनी भाजपा महायुतीच्या पाठीशी उभं राहायला हवं. फडणवीस यांनी प्रत्येक घरात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लखपती दीदी होण्याचा झरा वाहण्याचं स्वप्न उभं केलं आणि विकासाचा रथ अकोल्यापर्यंत आणण्याची ग्वाही दिली.

विकासाच्या आश्वासनांचा महापूर
मुख्यमंत्र्यांनी एका मागोमाग एक धडाकेबाज घोषणा करत सांगितलं की अकोल्यात तब्बल दोन हजार 700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण झालं आहे. यामध्ये 150 कोटींचं नवीन हॉस्पिटल, पशुवैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा संकुल आणि ऑलिंपिक दर्जाचा स्विमिंग पूल, साडेसहा कोटींची भूयारी गटारी योजना, दिवसा 12 तास शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी 10 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प अशा योजनांचा समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच 100 दिवसांत आम्ही प्रशासनाच्या हाती कृती आराखडा दिला आणि त्या योजनेनुसार सरकारने झपाट्याने काम सुरु केलं. आधी जे प्रशासन सुस्त होतं, त्याला धावायला भाग पाडलं. शासकीय कार्यालयातली बदलती कार्यसंस्कृती हा यशाचा मुख्य पुरावा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
गावखेड्यांची प्रगती
फडणवीसांनी अकोला शहरासाठी भूमिगत गटार योजनेतील 30 टक्के खर्च राज्य सरकार देणार असल्याची दिलासादायक घोषणा केली. तसेच, प्रत्येक गरीब कुटुंबाला घरकुल मिळेल, प्रत्येक मातेला लखपती दिदी बनविण्याचं उद्दिष्ट आहे. या माध्यमातून आर्थिक समृद्धीचं चित्र साकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकार 24 तास वीजपुरवठ्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना दिवसाही भरपूर वीज मिळावी यासाठी सौरऊर्जेच्या प्रकल्पावर सरकार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पावसाळ्यातही मोठ्या संख्येने आलेल्या शेतकरी आणि नागरिकांची उपस्थिती हीच सरकारच्या कामगिरीवरील विश्वासाचं प्रमाण असल्याचं त्यांनी नमूद केलं.
आदिवासी आयोगाची स्थापना
फडणवीस यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करताना सांगितले, आतंकवादाचा पूर्ण खातमा करण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. त्याचवेळी आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात येणार आहे, याचेही आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, विकासासाठी पाठपुरावा कसा करावा हे आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून शिकावं. त्यांनी अकोल्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या विधानाने सावरकरांच्या नेतृत्वावरही विश्वास दाखवला आणि स्थानिक जनतेच्या आशा-आकांक्षांना बळ दिलं.