
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय नेतृत्वाखालील चार विश्वासू पी.ए. आता आमदारकीच्या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या या प्रवासाने भाजपमधील निष्ठा आणि संधी यांचे नवे समीकरण समोर आले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या औरंगजेब आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुद्दा गाजत असतांना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पुरस्कार सोहळ्यात लाडक्या मंत्र्यांचा प्रश्न विचारतांना त्यांनी आपल्या शैलीत प्रश्नाचे उत्तर दिले. मात्र याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे चार पीए आता आमदार झाले आहेत. महाराष्ट्रातील भाजप राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्व नेहमीच अबाधित राहिले आहे. सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करत आहेत. या प्रवासात त्यांनी अनेक सहकारी जोडले, त्यांना राजकारणात उंच स्थानावर पोहोचण्यास मदत केली. पण खरे भाग्यवान ठरले ते त्यांच्या कट्टर विश्वासू सहकाऱ्यांपैकी काही जण.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आमदारांची लिस्ट जारी करण्यात आली होती. या लिस्टमध्ये नागपूरचे संदीप जोशी यांना उमेदवारी मिळाली आहे. जोशी हे केवळ फडणवीस यांचे विश्वासूच नाहीत तर त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेले सहकारी आहेत. सुमित वानखेडे यांना राजकारणात संधी मिळाल्यानंतर, जोशी हेच मुख्यमंत्री कार्यालयात OSD (Officer on Special Duty) म्हणून नियुक्त झाले होते. यापूर्वी विधान परिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या जोशींना आता मात्र आमदार होण्याची संधी पक्की मिळाली आहे.

राजकारणात ‘विश्वास’ महत्त्वाचा
फडणवीस यांचे पहिले पी.ए. म्हणून ओळखले जाणारे अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. पवार हेही मुख्यमंत्री कार्यालयात स्वीय सचिव होते आणि त्यांनी फडणवीस यांच्यासोबत जवळून काम केले आहे. फडणवीस यांचे सर्वाधिक चर्चेत राहिलेले पी.ए. म्हणजे सुमित वानखेडे होते. भाजपने त्यांना आर्वी मतदारसंघातून उमेदवारी दिली, त्यामुळे राजकीय गोंधळ उडाला. तत्कालीन आमदार दादाराव केचे यांचे तिकीट कापले गेले. यावरून असंतोष वाढला आणि त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. शेवटी वानखेडे यांनी निवडणूक जिंकून आमदार पद मिळवले आणि फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला.
फडणवीस यांचे आणखी एक निष्ठावान सहकारी म्हणजे श्रीकांत भारतीय, ज्यांनी विधान परिषदेत विजय मिळवला. श्रीकांत भारतीय हे विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात सक्रिय होते. २०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर, भारतीय यांची मुख्यमंत्री कार्यालयात OSD म्हणून नियुक्ती झाली होती. पुढे भाजपच्या प्रदेश सचिव पदावरही त्यांनी काम पाहिले. हे चारही सहकारी म्हणजे फडणवीस यांच्या राजकीय यंत्रणेतील महत्वाचे आधारस्तंभ आहेत. संदीप जोशी (संभाव्य आमदार), श्रीकांत भारतीय (विधान परिषद सदस्य), सुमित वानखेडे आणि अभिमन्यू पवार (विधानसभा सदस्य) असे फडणवीस यांचे विश्वासू सहकारी वेगवेगळ्या पातळ्यांवर चमकत आहेत.
Prakash Ambedkar : जातीय हिंसेशिवाय भाजप-आरएसएसचे अस्तित्व शक्य नाही
लाडके मंत्री
राजकीय घडामोडी रंगत असताना, एका पुरस्कार सोहळ्यात फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील लाडके मंत्री कोण? या प्रश्नावर मिश्कील उत्तर दिले. जयंत पाटील यांनी विचारले की, ‘मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री कोण?’ त्यावर फडणवीस यांनी हसत म्हटले ‘मी आता लाडका मंत्री योजना जाहीर करतोय. त्या योजनेत जे बसतील, त्यांना मी लाडका मंत्री म्हणून घोषित करेन!’ ही फडणवीस यांची राजकीय खेळीच होती. त्यांनी उत्तर दिले पण नाव घेतले नाही.
भाजपमध्ये निष्ठावान सहकाऱ्यांना संधी मिळतेच, पण त्यासाठी समर्पण, कष्ट आणि निष्ठा महत्त्वाची असते. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकाऱ्यांना योग्य संधी दिल्या, राजकीय प्रगतीचा मार्ग दाखवला आणि आता तेच सहकारी विविध स्तरांवर यशस्वी होत आहेत. राजकारणात यश मिळवायचं असेल, तर तुमच्यावर कोणाचा तरी विश्वास असावा लागतो हेच यातून अधोरेखित होते.