
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 मार्च रोजी नागपुरात महत्त्वाची बैठक घेतली.
एकेकाळी अबू आझमी यांनी औरंगजेबावर केलेल्या टिप्पणीनंतर सुरू झालेला हा वाद अद्याप शांत झालेला नाही. उलट, महाराष्ट्रातून सुरु झालेला हा वाद उत्तर प्रदेश आणि बिहारमार्गे पुन्हा महाराष्ट्रात पोहोचला आहे. महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच नागपुरात पाऊल ठेवले आहे. त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. नागपूर हे फडणवीसांचे गड मानले जाते. मात्र, या गडावर अचानक उसळलेल्या या वादामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक नेत्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी शांततेचे आवाहन केले आहे. तथापि, हा मुद्दा अद्यापही चच्रेत आहे.
नागपुरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण नागपूरच नाही तर महाराष्ट्र हादरले होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर पोलिस मुख्यालयात शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘मी या हिंसाचारावर उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आहे. या बैठकीत बावनकुळे उपस्थित होते. आम्ही संपूर्ण घटनेचा बारकाईने आढावा घेतला आहे, पुढील कारवाईबाबत चर्चा केली आहे.’ वादाच्या दिवशी औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर जाळण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तथापि, काही समाजकंटकांनी पॉडकास्ट आणि सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवल्या की, पवित्र ‘चादर’ देखील जाळली गेली आहे. या अफवेचा परिणाम म्हणून, संतप्त जमावाने दगडफेक केली, वाहने जाळली आणि अनेक दुकानांवर हल्ले चढवले.

मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
नागपूर हिंसाचारावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, ‘जे काही नुकसान झाले आहे ते दंगलखोरांकडून वसूल केले जाईल. जर त्यांनी पैसे दिले नाहीत, तर त्यांची मालमत्ता विकून नुकसान भरपाई केली जाईल. गरज पडल्यास बुलडोझरचा वापर करण्यात येईल.’ सकाळी औरंगजेबाच्या कबरीची प्रतिकृती जाळण्यात आल्याची घटना घडली, ज्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर कुराणातील एक आयत लिहिल्याची अफवा पसरल्यानंतर मोठा जमाव रस्त्यावर उतरला, दगडफेक व जाळपोळ झाली.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दंगल करणाऱ्यांना अटक केली जात आहे. आतापर्यंत 104 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, दंगलीत सहभागी असलेल्या किंवा दंगलखोरांना मदत करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. तसेच, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाईल. आतापर्यंत 68 सोशल मीडिया पोस्ट ओळखून हटवण्यात आल्या आहेत, आणि अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Praful Patel : नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे स्वप्नातून रस्त्यावर येण्यास सज्ज