
समृद्धी महामार्गाच्या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शक्तिपीठ महामार्गा’च्या माध्यमातून मराठवाडा आणि गडचिरोलीच्या विकासाचे नवे दालन उघडण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुंबई ते नागपूरचा प्रवास आता केवळ आठ तासांत पूर्ण होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणावेळी केले. मात्र हा केवळ प्रवासाचा टप्पा नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा टप्पा असल्याची ठाम जाणीव त्यांनी आपल्या भाषणातून दिली. याच प्रसंगी ‘शक्तिपीठ महामार्गा’चा निर्धार करत त्यांनी पुढील क्रांतिकारक योजनेचा नारळही फोडला.
इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. आता नागपूर ते मुंबई हा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय आठ तासांत होणार असून, यामुळे व्यापार, पर्यटन, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्राला नवे पंख मिळणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यानंतर पुढील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘शक्तिपीठ महामार्गा’ची घोषणा केली. हा महामार्ग 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. वर्ध्यापासून सिंधुदुर्गापर्यंत महाराष्ट्राच्या हृदयातून कोकणाच्या किनाऱ्यापर्यंतचे अंतर जोडणार आहे.

विकासाचे प्रवेशद्वार उघडले
या महामार्गाचा गडचिरोलीसाठी विशेषतः परिवर्तन घडवणारा भाग असेल. मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोलीसारख्या मागास भागात स्टील उद्योग उभा राहतो आहे. गेल कंपनीने उभारलेल्या गॅस पाइपलाइनमुळे त्याला चालना मिळणार आहे. या पाइपलाइनद्वारे गडचिरोली परिसरात गॅसपुरवठा सुरळीत होणार असून, स्टीलसह इतर उद्योगांसाठी एक नवे युग सुरु होणार आहे. गडचिरोलीत रोजगाराच्या संधी, स्थानिक विकास आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.
805 किलोमीटर लांबीचा हा सहा पदरी महामार्ग फक्त वाहतुकीसाठी नाही, तर राज्याच्या धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत क्रांतिकारक ठरणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हे नुसते रस्त्याचे जाळे नसून हे महाराष्ट्राच्या भावविश्वाचे आणि व्यवहारविश्वाचे एक संमेलनबिंदू ठरेल. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. 26 इंटरचेंज पॉईंट्स, 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग्स यांचा यात समावेश असेल. प्रकल्पाचा एकूण खर्च 86 हजार कोटी रुपयांवर जाणार आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सर्वात मोठी पायाभूत सुविधा योजना ठरणार आहे.
तंत्रज्ञानाधिष्ठित रचना
फडणवीस यांनी नमूद केलं की, या महामार्गावर 73 पूल, वन्य प्राण्यांसाठी ओव्हरपास-अंडरपास, 60 डिग्री सेल्सियस तापमानाला प्रतिसाद देणाऱ्या अॅक्टिव स्मार्ट बोगद्यांची निर्मिती, आणि 200 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची तयारी केली आहे. 22 ठिकाणी आधुनिक सुविधा केंद्रांची उभारणीही होणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “2014 मध्ये आम्ही जे स्वप्न पाहिलं, त्याची आज पूर्णता होते आहे. हे केवळ रस्ते नाहीत, तर महाराष्ट्राला जोडणारे इकॉनॉमिक कॉरिडॉर आहेत. आज जे घडलं त्यावरून आम्ही म्हणू शकतो की – हे फक्त सुरुवात आहे. आता शक्तिपीठ महामार्गातून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने बदलायचं आहे.
समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केवळ एक प्रकल्पाचा शेवट नव्हे, तर शक्तिपीठ महामार्गाच्या रूपाने नव्या युगाची सुरुवात आहे. गडचिरोलीसारख्या भागांना ही नवी आशा आणि दिशा देणारी ही योजना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला स्पर्श करणार आहे, एकात्मता, विकास आणि समृद्धीच्या दिशेने.