
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.
राज्यभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य पार्श्वभूमीत भारतीय सैन्यदलाच्या समर्थनार्थ आणि देशभक्तीच्या अभूतपूर्व भावनेच्या जागृतीसाठी महायुती सरकारने तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सकाळी ८ वाजता नागपूरच्या रस्त्यावर तिरंगा हातात घेऊन पायी सहभागी होणार आहेत. ऑपरेशन शिंदूरच्या यशानंतर, देशात एकात्मतेची लाट निर्माण झाली असून त्याचे केंद्र नागपूर ठरत आहे.
लॉ कॉलेज चौक ते शंकर नगर चौक दरम्यान ही रॅली काढण्यात येणार आहे. नागपूरकरांचा या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तिरंग्याच्या साक्षीने, नागपूरच्या रस्त्यांवर एकात्मतेचा आणि देशभक्तीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. ही रॅली केवळ शोभेची नव्हे, तर भारताच्या एकात्मतेचा आणि सैन्याच्या शौर्याचा जिवंत साक्षात्कार ठरणार आहे.

यशाचा जल्लोष
पुलवामा परिसरात झालेल्या हल्ल्याचा जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशवासीयांचे मस्तक अभिमानाने उंचावले. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणारी ही तिरंगा रॅली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही रॅली उभा एकतेचा आणि शौर्याचा साक्षात्कार ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आदेश न देता, स्वतः मैदानात उतरून देशभक्तीचा एक नवा आदर्श समाजासमोर मांडला आहे. पायी चालत तिरंगा रॅलीत सहभाग घेणे ही त्यांच्या नेतृत्वातील प्रामाणिक भावनांची साक्ष आहे. अशा वेळी नेतृत्व केवळ पदावरून नव्हे, तर कृतीतून जाणवते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूरच्या रस्त्यावर फडणवीसांची उपस्थिती.
महायुती मंत्र्यांचा सहभाग
मुख्यमंत्रींसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्यात तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत खासदार नरेश म्हस्के, हेमंत पवार यांच्यासारखे शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यभरात ही रॅली एकसंधपणे काढण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक मंत्री, आमदार, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा या तिरंगा रॅलीत सहभाग नाही. ते नांदेड दौऱ्यावर असणार आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यांची ही भूमिका भावनिक दृष्टिकोनातून मोलाची असली, तरी एकत्रिततेच्या क्षणी तिरंगा रॅलीपासून राष्ट्रवादीच्या अलिप्ततेची नोंद राज्यभर घेतली जात आहे.
नागपूरपासून ठाण्यापर्यंत आणि पुण्यापासून विदर्भाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तिरंग्याच्या रॅलीच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची भावना एकत्र येत आहे. सैन्याच्या समर्थनार्थ, ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ, आणि देशासाठी सर्वस्व समर्पित करण्याच्या निर्धारासाठी ही रॅली एक सशक्त माध्यम ठरत आहे.