
पित्याच्या हत्येनंतरही धैर्य न हरवता वैभवी देशमुखने बारावीत उत्तम गुण मिळवत यश संपादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तिचं फोनवर अभिनंदन करत खास पत्र दिलं.
एका पित्याच्या निर्घृण हत्येने कोसळलेले जग, अश्रूंमध्ये विरलेले दिवस. पण या दुःखाच्या गर्तेतही एक तेजस्वी कन्या न थांबता चालत राहिली. ही प्रेरणादायी कहाणी आहे मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या सुपुत्री वैभवी देशमुख हिची. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांची भरदिवसा निघृण हत्या करण्यात आली. गावात भय आणि शोकाचं वातावरण पसरलं. एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यांची कन्या वैभवीसाठी हे दुःख केवळ पित्याचं अपघाती निधन नव्हतं, तर एका आधारस्तंभाच्या आकस्मिक गमावण्याचा आघात होता.

वैभवीने दु:खाच्या त्या काळ्याकुट्ट सावटात हार मानली नाही. वडिलांच्या आठवणींना बळ मानून, अश्रूंना सामावून घेत तिने बारावीच्या विज्ञान शाखेची परीक्षा दिली. आज परीक्षा निकाल जाहीर होताच संपूर्ण महाराष्ट्राला तिचा अभिमान वाटावा, असा निकाल ती घेऊन आली आहे. 85.33 टक्के गुण, ठाम जिद्दीची, अपार मेहनतीची आणि वडिलांच्या स्वप्नांची साक्ष देणारा. या प्रेरणादायी यशाचं कौतुक करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वैभवी देशमुख हिला फोन करून मनःपूर्वक अभिनंदन केलं. इतकंच नव्हे, तर एक विशेष भावनिक पत्रही लिहून तिच्या यशाला सलाम केला.
कौतुकाची बाब
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पत्रात लिहिलं, दु:खाच्या अशा कठीण काळातही तू ज्या प्रकारे आत्मविश्वास टिकवून बारावीचा परीक्षाफल उंचावलं आहेस. त्याला सलाम करावा लागेल. 85.33 टक्के गुण मिळवून तू आज फक्त स्वत:चं नव्हे, तर आपल्या दिवंगत वडिलांचंही स्वप्न साकार केलं आहेस. त्यांच्या अनुपस्थितीत आज तुझ्या पाठीवर संपूर्ण महाराष्ट्राची कौतुकाची थाप आहे. तू अनेक विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरली आहेस. तुझ्या प्रत्येक पावलात आम्ही सोबत आहोत. भविष्यातील यशासाठी माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
पत्रासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आत्मीयता वैभवीसाठी केवळ एक पुरस्कार नव्हता, तर तिच्या संघर्षाची आणि यशाची अधिकृत मान्यता होती. हे खास पत्र अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वाजळे यांनी तिच्या घरी प्रत्यक्ष भेट देत तिच्या हातात सोपवले. त्या भेटीच्या वेळी उपस्थित असलेले सर्वजण भावूक झाले. वैभवीच्या यशाने आज संपूर्ण मस्साजोग आणि बीड जिल्हा गर्वाने भरून आला आहे. तिच्या वडिलांचं स्वप्न, एक सुशिक्षित, सजग आणि प्रगतीशील समाज उभारण्याचं, तिने आजच्या यशाने अधिक बळकट केलं आहे.
हा क्षण केवळ यशाचा नाही, तर न्यायाच्या मागणीचाही आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अद्याप न्याय प्रक्रियेची वाट पाहत असलेलं कुटुंब आणि गावकरी आता अधिक सजगतेने पुढे येत आहेत. वैभवीच्या यशात एक संदेश आहे. अन्याय कितीही मोठा असो, जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर त्यावर मात करता येते. वैभवीचा प्रवास अजून खूप लांबचा आहे. पण या यशाने तिच्या पाठीवर केवळ राज्यकर्त्यांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची साथ उभी राहिली आहे