महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला; आरडाओरडा नको

Maharashtra : राहुलजींची स्क्रिप्ट म्हणजे बिनबुडाचे आरोप

Author

राहुल गांधींच्या लेखाने राजकीय वादळ निर्माण केलं, आणि फडणवीसांनी त्यावर तुटून पडत थेट प्रत्युत्तर दिलं. लोकशाहीच्या मंचावर हे शब्दांचे शरसंधान अधिकच तीव्र झालं आहे.

देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी उडाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखातून थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने “निवडणूक चोरी” केल्याचा गंभीर आरोप करत भाजपवर राजकीय स्फोट घडवून आणला. मात्र, या आरोपांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिले असून, राहुल गांधींना “आत्मपरीक्षण करावे” असा खणखणीत सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत राहुल गांधींच्या विधानांना ‘बिनबुडाचे’ ठरवत त्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, राहुल गांधी हे आपल्या पक्षाच्या सातत्याने होणाऱ्या पराभवांनी हताश झाले आहेत. खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीची खिल्ली आहे. फडणवीसांनी राहुल गांधींच्या परदेशातील वक्तव्यांवरही टीका करत म्हटले की, बोस्टनमध्ये राहुल गांधींनी भारताच्या निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेनंतर आता देशांतर्गत निवडणुकीबाबतही ते चुकीचे चित्र रंगवत आहेत. ही एकप्रकारची भारताच्या लोकशाही संस्थांची बदनामी आहे.

BJP : गोष्टींच्या दुनियेत राहिलात, आता सत्ता विसरा वास्तवात

गांधींचे आरोप

राहुल गांधी यांच्या लेखाने मोठी राजकीय खळबळ निर्माण केली आहे. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक प्रक्रियेचा गैरवापर करून विजय मिळवल्याचा आरोप स्क्रिप्ट मांडून केला आहे. त्यांच्या मते, भाजपने निवडणूक ‘चोरी’ करण्यासाठी पाच पद्धतींचा अवलंब केला. यात ईव्हीएमच्या माध्यमातून मतदानाच्या निकालांवर प्रभाव टाकणे, प्रशासनाचा वापर करून विरोधकांवर दबाव निर्माण करण्यात आला. प्रसारमाध्यमांचा प्रभाव वापरून जनमत दिशाभूल करणे, मोठ्या प्रमाणात आर्थिक ताकद वापरून मतदारांना आकर्षित केले. मतदारांना धमकी अथवा प्रलोभन देणे यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींमुळे लोकशाही प्रक्रियेचा अपमान झाला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Vijay Wadettiwar : मॅच फिक्सिंगचं सरकार आम्ही उघड करणार

जनतेचा अपमान करणे थांबवा

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांचा लेख म्हणजे सत्यापेक्षा कथानकांना दिलेली वरीष्ठता आहे. ते पराभव स्वीकारण्याऐवजी सर्व यंत्रणा, माध्यमं आणि प्रशासनावर शंका घेत आहेत, जे लोकशाहीच्या मूळ तत्त्वांवर आघात आहे. त्यांनी पुढे म्हटले, महाराष्ट्रातील लोकांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिलं, हे जनतेच्या विवेकाचं प्रतीक आहे. त्याचा अपमान राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधींच्या या टीकेनंतर भाजपने त्वरित आक्रमक भूमिका घेतली. पक्षाच्या प्रवक्त्यांनी ही एक “राजकीय दिशाभूल” असल्याचा आरोप केला आणि राहुल गांधींना देशाच्या लोकशाही संस्थांवर अविश्वास दाखवण्याचा दोष दिला.

दुसरीकडे, काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या लेखाचे समर्थन करत म्हटले की, ते फक्त निवडणूक प्रक्रियेतील उणीवांकडे लक्ष वेधत आहेत. याचा हेतू देशहिताचा आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडून या आरोपांची चौकशी होण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींच्या लेखामुळे आणि फडणवीसांच्या प्रत्युत्तरामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा धगधगत आहे. आरोपांच्या सावटाखाली राजकीय वातावरण तापलं आहे. आगामी दिवसांत या वादाचा राजकीय नकाशावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis : कायदा महत्त्वाचा, पण कुणाच्या बापाचा माल नाही

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!