
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठी भाषा, मशिदींवरील भोंगे, औरंगजेबाची कबर आणि नद्यांमधील प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत सरकारच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले.
गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत विविध ज्वलंत मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. मराठी भाषा, मशिदींवरील भोंगे, औरंगजेबाची कबर तसेच नद्यांमधील प्रदूषण यासारख्या विषयांवर त्यांनी परखड भाष्य केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देत, राज्य तुमच्या हातात चांगलं आलं आहे, योग्य रीतीने चालवा, असे सांगितले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि राज ठाकरेंच्या मुद्द्यांना उत्तर दिलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केलं की, राज्य उत्तम प्रकारे चालवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. हे राज्य आम्ही एकहाती चालवत नाही, तर सर्वांच्या विश्वासाने, सहभागाने आणि सहकार्याने पुढे नेण्याचा आमचा मानस आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत विचारणा झाल्यानंतर फडणवीस म्हणाले, सर्व नियमांबाहेर असलेल्या भोंग्यांवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं तंतोतंत पालन केलं जाईल. महाराष्ट्र सरकार कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेईल.

उदात्तीकरण होणार नाही
राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीविषयी आक्रमक भूमिका घेत ती हटवण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या कबरीला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संरक्षण दिलेलं आहे. आम्हाला औरंगजेब आवडतो किंवा नाही, याचा प्रश्न नाही. पण कायद्याने त्याला संरक्षण दिलं असल्याने आम्ही त्याचे पालन करू. मात्र, कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही.
मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना आदेश दिला की, बँकांमध्ये मराठीत व्यवहार केला जात आहे का, याची खात्री करा. जर मराठीत काम नसेल तर व्यवस्थापनाला ते करायला लावा. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य मिळायलाच हवं. मराठीत व्यवहार करण्याचा आग्रह चुकीचा नाही. पण त्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये. सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच मराठीचा सन्मान राखला पाहिजे.
मोठा उपक्रम हाती
महाराष्ट्रातील नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. नद्यांना निर्मळ करण्यासाठी आम्ही काही मोठे उपक्रम सुरू केले आहेत. हे काही एका रात्रीत होणारे काम नाही. मोठ्या प्रमाणावर खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. मात्र, महाराष्ट्रात कुंभमेळा जवळ आल्याने गोदावरी स्वच्छ करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. जेणेकरून त्या पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.