
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे सध्या प्रचंड अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर चहुबाजूने हल्ला चढवत राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया हा एक वेगळाच वादंग ठरतो आहे.
शरद पवार यांनी आपल्या शैलीत खोचक शब्दांत सत्ताधाऱ्यांना झोडपले आहे. या लोकांचा आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का? असा परखड सवाल करत त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केली आहे. तसेच, अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. स्वाभिमान असलेल्या कोणत्याही व्यक्तीने राजीनामा दिला असता, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.

Maharashtra Politics: ब्रँड ठाकरे वाचवण्यासाठी उद्धव-राज एकत्र
राजकारणात खळबळ
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाने राजकीय वातावरण तापवले असताना कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांमुळे मंत्री धनंजय मुंडे अजूनच गोत्यात आले आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली आहे. मात्र, सरकार यावर कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना, माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता, असे सांगितले.
शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका करत हा सगळा प्रकार म्हणजे नैतिकतेचा खेळ असल्याचे सूचित केले. पूर्वी मंत्र्यांवर आरोप झाले की तातडीने त्यांचा राजीनामा घेतला जायचा. शरद पवारांनी हे विधान फक्त विरोधकांसाठी केलं, की त्यात अजित पवारांनाही लक्ष्य करण्यात आलंय? हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण याच वाक्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांनाही टोला लगावला आहे. स्वाभिमान असलेल्या व्यक्तीने राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले, याचा अर्थ थेट धनंजय मुंडे आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांना उद्देशून होता का.
पवार घराण्यातील संघर्ष
धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकांमध्ये मोठा फरक आहे. अजित पवार हे सत्ताधारी गटासोबत असल्याने त्यांनी मुंडेंना थेट पाठिंबा दिला नसला, तरी अप्रत्यक्षपणे राजीनामा हा त्यांच्या निर्णयावर सोडला आहे. तर दुसरीकडे, शरद पवार यांनी मात्र या संपूर्ण सत्ताधारी व्यवस्थेवरच जोरदार टीका केली आहे.
पवार कुटुंबातील हा संघर्ष राजकीय दुरावा अधोरेखित करतो का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दोन गट स्पष्टपणे दिसत आहेत एक शरद पवारांचा पारंपरिक गट आणि दुसरा अजित पवारांच्या नेतृत्वाखालील नवा सत्ताधारी गट. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाने हा अंतर्गत संघर्ष आणखी चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.