
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ झाला आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी कामराला अटक करण्याची मागणी केली आहे.
कॉमेडियन कुणाल कामराच्या विधानामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या चौदाव्या दिवशी विधानसभेतही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटावर अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेत असताना, कामराच्या विधानाने वातावरण आणखीनच तापवले. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिपणीवरून वाद निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय जोरदार चर्चिला गेला.
विरोधक आणि सत्ताधारी पक्ष या प्रकरणावर परस्परविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. अनेकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करत कामराच्या बाजूने भूमिका घेतली आहे. विधानसभेत या विषयावर मोठा गदारोळ पाहायला मिळाला आणि अनेक आमदारांनी संताप व्यक्त केला.

Vidarbha : स्वच्छतेच्या अलंकाराने सजलेली आरोग्यसेवेची मंदिरशाळा
कठोर शिक्षेची मागणी
भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके कुणाल कामरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘राजकीय नेत्यांवर अशी वक्तव्ये करणे हे सध्या जणू फॅशन झाली आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करणाऱ्या कामराला अटक करायलाच हवी,’ असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
शिवसेना (शिंदे गट) आमदार अर्जुन खोतकर यांनीही सभागृहात हा मुद्दा मांडत कामराला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. ‘यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत आणि कठोरात कठोर कारवाई केली जाईल,’ असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आम्हाला स्टँडअप कॉमेडी आवडते, आम्ही ती पाहतो आणि दादही देतो. पण त्याच्या नावाखाली कोणत्याही नेत्यावर अपमानास्पद टीका केली जाणार असेल, तर ते सहन केले जाणार नाही. रणवीर अलाहाबादियासारखी वक्तव्ये आम्ही खपवून घेणार नाही,’ असे ते म्हणाले.
‘देशात स्वातंत्र्याचा स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही. आई-वडिलांवर, नेत्यांवर घाणेरडे स्टेटमेंट्स देणाऱ्या लोकांना माफी मिळणार नाही. कठोर कारवाई केली जाईल आणि कोणाचाही कितीही दबाव आला तरी संबंधितांना सोडले जाणार नाही,’ असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच, अशा वक्तव्यांमुळे संस्थांवरचा विश्वास कमी होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
विरोधकांचा संताप
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कामराच्या बाजूने भूमिका घेतली आहे. ‘या देशात आणि राज्यात कायदा आहे की नाही? हे राज्य कायद्याने चालवायचे की ठोकशाहीने? अशा प्रकारच्या टीका सहन करण्याची तयारी नेत्यांनी ठेवली पाहिजे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘कामराने काही चुकीचे बोलले आहे का? त्याच्या विधानाने काय मोठे नुकसान झाले आहे?’ असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था नामशेष झाली आहे. उद्योग राज्याबाहेर जात आहेत, लोक भीतीपोटी राज्य सोडत आहेत. शांततेचा दावा करणारेच हिंसा करत आहेत. हे सरकार महाराष्ट्राचा नाश करत आहे,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.