महाराष्ट्र

Dr. Parinay Fuke : कोरड्या पडलेल्या घश्यांसाठी विधानपरिषदेत आवाज बुलंद 

Maharashtra : जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीसाठी सरसावले परिणय फुके

Share:

Author

विदर्भात कडाक्याच्या उन्हाळ्याने पाणीटंचाई वाढवली आहे, आणि ग्रामपंचायतींमधील अनियमित पाणीपुरवठ्याने लोकांचे हाल सुरू आहेत. यातच डॉ. परिणय फुके यांनी जलजीवन मिशनच्या अडचणींवर आवाज उठवत लोकांच्या तहानलेल्या घशाला दिलासा देण्याचा संकल्प केला आहे.

विदर्भाच्या उन्हाळ्याचा तडाखा हा इतर भागांपेक्षा जास्त तीव्र असतो. इथे फक्त उन्हानेच रुद्र रूप धारण केलेले नसते, तर पाण्याचा प्रश्नही अधिक बिकट होतो. प्रत्येक थेंबासाठी लोकांना मैलोनमैल पायपीट करावी लागते. अनियमित आणि अपूर्ण पाणीपुरवठ्यामुळे अनेक गावांतील लोक अक्षरशः घशाला कोरड पडल्यागत जगत आहेत. घरोघरी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे, आणि या कठीण परिस्थितीत जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीवर बोट ठेवत लोकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधानपरिषदेत आपला आवाज बुलंद केला आहे.

विदर्भातील उन्हाळा इतका प्रखर असतो की, तिथे फक्त माणसं नाही तर पक्षी आणि प्राणीही पाण्याविना तडफडत असतात. जिथे नद्यांचा प्रवाहही उन्हाळ्यात आटतो, तिथे ग्रामस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा हा केवळ कागदावरच असल्यासारखा वाटतो. अनेक गावांत जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन बसवण्याचे काम अर्धवट सोडले गेले आहे. काही ठिकाणी पाईप बसवले पण पाणी आले नाही, काही ठिकाणी नळ जोडले पण पाईप फुटले. परिणामी, ‘घरोघरी नळ जोडले पण घशाला पाणी नाही’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

Dr. Parinay Fuke : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या  

पाण्यासाठी तडफड

डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत याबाबत सांगितले की, विदर्भाच्या ग्रामस्थ माणसाला उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात, हे ठिक आहे. पण त्याला पाण्यासाठीही तडफडावं लागलं, तर हे अत्यंत गंभीर आहे. जलजीवन मिशन ही योजना प्रत्यक्षात प्रत्येक घरात नळ आणि नळाला पाणी अशी होती. मात्र, अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी पाणीपुरवठा योजना अर्धवट टाकून पलायन केले.

कंत्राटदार जबाबदारी सोडून पळून गेले, याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होतोय. कुठे नळ आहेत पण पाणी नाही, कुठे बोरवेल आहेत पण त्यातून केवळ गढूळ पाणी निघते. मग अशा अपूर्ण योजनांचा लाभ कसा घ्यायचा, असा सवाल डॉ. परिणय फुके यांनी सरकारला विधान परिषदेत विचारला.

विदर्भाची संस्कृती

डॉ. परिणय फुके यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला. काही गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत बोरअवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, भूजल पातळी सतत घसरत असल्यामुळे दोन-तीन वर्षांतच बोरवेल कोरड्या पडतात. त्यामुळे, योजनेच्या दीर्घकालीन यशस्वितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. “जर भूजल पातळी खालावली, तर पुन्हा नवा बोरअवेल खणायचा का? हा शाश्वत उपाय आहे का?” असा मुद्दा त्यांनी मांडला

विदर्भातील संस्कृती अशी आहे की, इथे अतिथीला घरी आल्यावर पहिल्यांदा पाणी दिलं जातं. संत गाडगेबाबा यांनी ‘तहानलेल्याला पाणी द्या’ असा उपदेश दिला होता. मात्र, आज परिस्थिती अशी आहे की, घरातील लोकांनाही पाणी पुरत नाही, तर अतिथींना काय द्यायचं? परिस्थिती बदलली पाहिजे, आणि यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाल करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!