
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगताना महाविकास आघाडीत मात्र युती की स्वातंत्र्य, या पेचात सगळं अडकलंय. शरद पवार, वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळे यांच्या गूढ विधानांनी आघाडीचा मार्ग अधिकच धूसर केला आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणूक जवळ आल्या आहेत आणि राजकीय हवामानात नवे ढग गोळा होऊ लागलेत. विविध पक्षांनी तयारीला सुरुवात केली असली, तरी आघाडीचे समीकरण मात्र अजूनही धुसरच आहे. विशेषतः महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युती होईल की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावर भाष्य केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आघाडीच्या भवितव्यावर एकप्रकारे धुळफेकच केली आहे. शरद पवारांच्या भाषणाचे ‘दोन-तीन अर्थ’ काढावे लागतात, असा सूचक टोला लगावत त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त केली. तोपर्यंत काहीच बोलता येत नाही, जोपर्यंत त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळत नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. इतकंच नव्हे, तर स्थानिक नेतेच निर्णय घेतील, अशी मुभा सर्वच पक्ष देताना दिसत आहेत. हे अधोरेखित करून त्यांनी महाविकास आघाडीची गोंधळलेली दिशा उघड केली.

Bhaskar Jadhav : गुजराती नेत्यांचे स्वप्न उद्धव-राज युतीनं उधळून लावू
युतीला विरोध?
नागपूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता अत्यल्प असल्याचे सूत्रांकडून समजते. नागपूर शहर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचा सुरुवातीपासूनच आघाडीला विरोध आहे. ग्रामीण भागात माजी मंत्री सुनील केदार हे एकहाती निर्णय घेतात आणि ते कोणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे या भागात काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर केले आहे की, महायुती (भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट) एकत्र लढणार आहे. मात्र, काही ठिकाणी स्वतंत्र निर्णय घेतला जाऊ शकतो, हे त्यांचे वक्तव्य सुद्धा अनेक संभावनांना वाव देते. त्यामुळे इथेही गोंधळ काही कमी नाही.
शरद पवार यांच्या भाषणाच्या गूढतेसोबतच, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पावसाच्या आणि छत्रीच्या उपमाही चर्चेचा विषय ठरली आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. रेनकोट आणि छत्रीचं काय करायचं, हे त्यांनी ठरवायचं. आम्हाला त्याच्या अर्थाचा माग काढता येत नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की महापालिकांसह सर्व स्थानिक निवडणुकींसाठी आघाडीची सूत्रं स्थानिक नेत्यांकडेच दिली आहेत. परिणामी, आघाडीचे निर्णय एका राज्यव्यापी व्यूहातून न होता, ठिकाणी ठिकाणी वेगळे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजकीय समीकरणे
एकीकडे भाजप युतीमध्ये कमालीचा शिस्तबद्धपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतानाच, महाविकास आघाडीत ‘अस्पष्टता’, ‘स्वतंत्र धोरणे’, आणि ‘व्यक्तिगत भिन्न भूमिका’ यामुळे मतदारांमध्ये संभ्रम वाढतोय.
या सगळ्या पार्श्वभूमीवर हे स्पष्ट होतंय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ‘एकतापूर्ण आघाडी’पेक्षा ‘स्वतंत्र सत्ताकांक्षा’ यांचा रणसंग्राम ठरणार आहे. आता सर्वांच्या नजरा या आघाड्यांतील मोठ्या नेत्यांच्या पुढील वक्तव्यांकडे लागल्या आहेत. शरद पवार खरंच काय सुचवत आहेत? सुप्रिया सुळे यांची ‘राजकीय छत्री’ कुणासाठी उघडली जात आहे? विजय वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे म्हणणे ‘राजकीय भूमिका’ आहे की ‘स्वतंत्रतेची घोषणा’? या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत निवडणुकीचे नाट्य थांबेलसं वाटत नाही.