महाराष्ट्र

भाईजींच्या ‘एकनाथ’ला करून दाखविले ZP उपाध्यक्ष

भंडाऱ्यात Parinay Fuke यांनी पाळला महायुतीचा धर्म

Share:

Author

भंडारा जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा धर्म पाळत माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भाईजींच्या एकनाथला उपाध्यक्ष करून दाखविले आहे.

अध्यक्ष पद हातात असतानाही ते गमवावे लागले. मात्र आपली राजकीय खेळी खेळत माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ फेंडर यांना उपाध्यक्ष करून दाखविले आहे. आपल्या या कृतीतून त्यांनी महायुतीचा धर्म पाळल्याचा संदेश सर्वांना दिला आहे. त्यामुळं प्रफुल पटेल आणि परिणय फुके यांनी करून दाखविलं हे बोललं जात आहे. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एकत्र यावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रयत्न केले. काँग्रेस भाजपसोबत येण्यासाठी काहीही करायला तयार होती. मात्र परिणय फुके यांनी काँग्रेसचे हे मनसुबे धुळीस मिळविले. काँग्रेसच्या कविता उईके या भाजपमध्ये येण्यासाठी तयार होत्या. परंतु भाजपच्या गटनेत्यामुळं त्यांचा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही. परिणामी अध्यक्ष पद काँग्रेसला मिळालं.

काँग्रेसनं अध्यक्ष पद मिळविलं तरी परिणय फुके यांनी उपाध्यक्ष करून दाखविणार असा चंग बांधला. उपाध्यक्षपदासाठी भाजपचे विनोद बांते, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ फेंडर, देवा इलमे यांची नावं चर्चेत होती. परंतु अखेर भाईजींचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ फेंडर हे उपाध्यक्ष झालेत. यातून डॉ. परिणय फुके यांचा विजय झाल्याचा संदेश गेला आहे. काँग्रेसला बाजूला ठेवत डॉ. फुके यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांचा सन्मान राखला आहे. इतकेच नव्हे तर भाजपबद्दल एकनिष्ठता सिद्ध केली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा भंडारा-गोंदिया जिल्ह्यात फुके हे महायुतीचे ‘गेमचेंजर’ ठरले आहेत.

पक्षनिष्ठतेसाठी Parinay Fuke म्हणाले पटोलेंना ना.. ना..

आता लगाम गरजेची

कविता उईके यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असता तर संपूर्ण राज्यातील बातम्यांची हेडलाइनच बदलली असती. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात भाजपचा झेडपी अध्यक्ष असे ते चित्र असते. पण स्वार्थापोटी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी आणि गटनेत्याला ही बाब कळली नाही. उईके भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत, याची कानोकान खबर कोणाला लागू देण्यात आली नाही. त्यामुळं अध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं.

आता या संपूर्ण प्रकरणावर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला लक्ष घालणे गरजेचे राहणार आहे. राज्याील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात राहावी यासाठी महायुती प्रयत्न करीत आहे. भाजपनं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशात भंडाऱ्यातील प्रकार गंभीर मानला जात आहे. उईके यांच्या संदर्भात झालेल्या प्रकारातून आता भाजपला जिल्हा कार्यकारिणीवर चांगली लगाम कसावी लागणार आहे. वेळ आल्यास कार्यकारिणीमध्ये व्यापक बदलही करावा लागणार आहे. अन्यथा वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांना कोणताही अर्थ राहणार नाही असं बोललं जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!