
मुंबईतील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन आणि सहकारी बँकांचे सशक्तीकरण हे महायुती सरकारचे प्राधान्य असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदेंनी एक गौप्यस्फोट देखील केला आहे.
मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महायुती सरकार ठोस पाऊले उचलत आहे. झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासह सहकारी बँकांच्या सशक्तीकरणावर भर दिला जात आहे. मुंबईकरांचे बेघर होण्याचे संकट टाळण्यासाठी आणि पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी शिंदे यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहे. अभ्युदय नगर येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 51व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
मुंबई शहरात अनेक कुटुंबे अद्यापही झोपडपट्टीत राहत आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी महायुती सरकार प्रबळ प्रयत्न करत आहे. यासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली. मुंबईकर बेघर होऊ नयेत, यासाठी SRA प्रकल्प प्रभावीपणे राबवले पाहिजेत. स्वयंपूर्ण विकास ही संकल्पना मुंबईसाठी वरदान ठरेल. बाळासाहेब ठाकरे यांनी 40 लाख झोपडपट्टीवासियांना घरे देण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र त्याकाळी अनेकांनी त्याची टिंगल केली. आज महायुती सरकार हे स्वप्न पूर्ण करणार आहे. याची मी गॅरंटी देतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शासनाचा पूर्ण पाठिंबा
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मुंबई बँकेला संकटात आणण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला. शिंदे म्हणाले, “मराठी माणसाला सशक्त करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली. मात्र महाविकास आघाडीच्या काळात मुंबई बँकेला जाणीवपूर्वक अडचणीत आणले जात होते.
प्रवीण दरेकर यांच्या विरोधात चौकशी लावली होती. त्यांना अटक करण्याची देखील योजना होती. त्या वेळी मी सरकारमध्ये होतो, त्यामुळे हे सर्व मला ठाऊक आहे. अनेक जण यात सामील होते, पण मला कळले की हे अन्यायकारक आहे. त्यामुळे मी वेगाने निर्णय घेतला आणि टांगा पलटी करून टाकला, असे शिंदे म्हणाले.
बँक झाली लाडकी
बँकेच्या यशाचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “50 वर्षांत 50 शाखांचा विस्तार करणे हे बँकेच्या विश्वासार्हतेचे लक्षण आहे. ही केवळ आर्थिक संस्था नसून, सर्वसामान्य माणसाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असलेली बँक आहे. विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 25 हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्यामुळे आता ही बँक माझ्यासाठीही लाडकी झाली आहे.
अभ्युदय नगरचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर भाष्य करताना शिंदे यांनी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही सात शासकीय यंत्रणांना एकत्र आणले आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत राहायला यावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फक्त निवडणुकीपुरता मराठी माणूस आठवायचा नाही, तर त्याच्या प्रश्नांचे कायमस्वरूपी समाधान करून त्यांच्या मनात जागा मिळवायची आहे.