
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नव्हते. परंतु सर्व आमदारांनी विनंती केल्यानंतर ते तयार झालेत. गुलाबराव पाटील यांनी हा खुलासा केला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत प्राप्त झाले. महायुतीत मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नावरून सत्ता स्थापनेला बराच विलंब झाला. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदे तयार नव्हते, असा खुलासा शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगाव येथे गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आय़ोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची आम्ही सर्व आमदारांनी समजूत काढली. त्यांना सांगितलं की तुम्ही सत्तेत असले पाहिजे. आपले सरकार होते त्याकाळात देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखविलं होतं. त्यामुळे आपणसुद्धा आता त्यांच्या सरकारमध्ये मोठेपणा दाखवायला हवा, असं आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं. कारण सत्ता येण्यात एकनाथ शिंदे नावाची मोठी ताकद होती, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

शिंदेंनी ठेवला मान
सर्व आमदारांनी मिळून एकनाथ शिंदे यांना विनंती केली. एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवला आणि अखेर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. मंत्री आणि पालकमंत्री पदासाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मंत्रीपद स्वीकारण्यासाठी अनेक जिल्ह्यात सिनियर आमदारही होते. काही जण तीन तीन वेळा आमदार झाले होते, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
राज्यात 40 आमदार असे आहेत, ज्यांनी तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला आहे. त्यात मलाही तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. मंत्रीपदासाठी लॉबिंग करायला मी कुठेच गेलो नाही. ज्या माणसाला पद द्यायचं असतं त्याच्यासमोर किती अडचणी असतात ते माहिती आहे. आधी उद्धव ठाकरे नंतर एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही मला पाणी पुरवठा खातं मिळालं. राज्यातलं हे असं पहिलंच उदाहरण असणार, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहे.
अनेकांचा शिंदे गटात प्रवेश
मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या गटाला सोडून शिवसेना एकनाथ शिंदे गटात येत आहेत. भविष्यात रत्नागिरी विधानसभेतील ‘उबाठा’ची 70 हजार मते 17 हजारांवर आणण्याचे आव्हान आम्ही पेलणार आहोत, असे उदय सामंत म्हणाले.
रत्नागिरीत शिवसेनेच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाची मोहिम सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.