
राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियानातून कार्यक्षमतेचा नवा आदर्श उभा राहिला आहे. या उपक्रमात अमरावती विभागीय माहिती कार्यालयाने राज्यात दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी कामगिरी नोंदवत आपली छाप सोडली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाने प्रशासनामध्ये नवचैतन्याची लाट निर्माण केली आहे. या उपक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अमरावतीच्या विभागीय माहिती कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावल्याची गौरवास्पद कामगिरी नोंदवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच या अभिनव उपक्रमाचा निकाल जाहीर केला. राज्यभरातील महसूल विभागांतील एकूण 40 विभागस्तरीय आणि 42 जिल्हास्तरीय कार्यालयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. कार्यालयीन व्यवस्थापन, संकेतस्थळांचा दर्जा, स्वच्छता, तंत्रज्ञानाचा वापर, तक्रार निवारण प्रणाली, नागरिकांना सुलभ सेवा, गुंतवणुकीला चालना अशा 10 प्रमुख निकषांवर आधारित ही स्पर्धा पार पडली.

नागपूर विभाग तृतीय
यामध्ये अमरावती विभागीय माहिती कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यभरात दुसऱ्या क्रमांकाची जागा मिळवली आहे. ही कामगिरी विभागाच्या कुशल नेतृत्व, प्रभावी नियोजन, आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. या स्पर्धेत विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर नागपूरच्या विभागीय कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या तिन्ही कार्यालयांनी नवकल्पनांचा अवलंब करत, कार्यालयीन व्यवस्थापनाला नव्या उंचीवर नेले आहे.
Yashomati Thakur : महाराष्ट्राच्या हजारो गावांचं शालेय पान अजूनही रिकामं
देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजयी कार्यालयांचे अभिनंदन करत म्हणाले की, “हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून, प्रशासनातील गुणवत्तेचा आणि सेवाभावाचा नवा मानदंड ठरला आहे. अशा प्रयत्नांमुळे राज्याच्या प्रशासनात सकारात्मक बदल घडून येईल. या यशाबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आणि अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनीही अमरावती विभागीय माहिती कार्यालयाच्या चमूचे विशेष कौतुक करत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ही कामगिरी प्रशासनातील पारदर्शकता, गतिशीलता आणि नागरिकाभिमुखतेचा उत्तम आदर्श ठरतो. अमरावतीसारख्या विभागातून अशी उल्लेखनीय कामगिरी समोर येणे म्हणजेच राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने उचललेले एक महत्वाचे पाऊल होय.