
दंगलीच्या छायेत सैरावैरा झालेलं अकोला आता शिस्तीच्या प्रकाशाकडे वाटचाल करत आहे. नागपूरच्या रस्त्यांना शिस्तीची चौकट देणारे अर्चित चांडक आता अकोल्यात कायद्याचा नवा अध्याय लिहायला सज्ज झाले आहेत.
अकोल्याच्या रस्त्यांवर सध्या एक नवीन आशा, नव्या शिस्तीचा व एक सकारात्मक बदलाचा सुगंध दरवळतो आहे. नागपूरमध्ये आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवत चर्चेत आलेले अर्चित चांडक आता अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. नागपूरसारख्या महत्त्वाच्या उपराजधानीत ट्राफिक जामसारख्या जटिल समस्यांवर उपाय शोधणारे अधिकारी, आता अकोल्याच्या अस्थिरतेला स्थैर्य देण्याच्या मोहिमेवर निघाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दिग्गजांच्या शहरातील वाहवा मिळवलेले अर्चित चांडक, नागपूरमध्ये “ट्रॅफिक मॅनेजमेंटचे आयकॉन” म्हणून ओळखले जातात. तिथल्या अव्यवस्थित वाहतुकीला नियमांच्या चौकटीत आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. माध्यमांपासून नागपूरकरांच्या मनापर्यंत, सगळीकडे चांडक हे नाव आदराने घेतले जाते.

IPS Transfer : सीएमच्या गावात डंका गाजविणारे चांडक सांभाळणार अकोला
घेतली परिस्थितीची जाण
सामान्यतः अधिकारी रुजू झाल्यावरच त्यांच्या कारभाराची सुरुवात होते. पण चांडक यांनी अकोल्यात पाऊल ठेवण्याआधीच जिल्ह्याच्या समस्यांचा बारकाईने अभ्यास सुरू केला. एलसीबी, शहर वाहतूक, विशेष शाखा आणि ग्रामीण पोलिस यंत्रणेतील हालचालींचा तपशीलवार अभ्यास करून त्यांनी एक मजबूत रणनीत आखण्यास सुरुवात केली आहे. अलीकडील काळात अकोल्यात झालेल्या जातीय तणावाच्या घटनांचा इतिहास आणि त्यामागची कारणमीमांसा देखील त्यांनी केली आहे.
‘द लोकहित लाईव्ह’शी विशेष संवाद साधताना चांडक यांनी स्पष्टपणे सांगितले की, दंगली, तणाव, जातीय रेटा, या सगळ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कुणालाही सवलत दिली जाणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे अकोल्यातील जनतेमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे की, आता परिस्थिती बदलणार आहे. “जो कायद्यात राहील, तो फायद्यात राहील,” असा थेट संदेश चांडक यांनी समाजकंटकांना दिला आहे. समाजकंटकांसाठी हा इशारा जितका ठाम आहे, तितकाच सामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारा आहे.
दंगलीचा डाग
अकोला हे शहर अलीकडच्या काळात दोन मोठ्या दंगलींच्या सावलीत गेले. त्यावेळचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी काही काळ दंगलखोरांना लगाम लावला. पण दंगलखोर काही सुधारले नाहीत. आता चांडक यांच्यावर ही जबाबदारी आहे. अकोल्याच्या नावाला लागलेला ‘दंगलीचं गाव’हा डाग पुसण्याची. आपल्या कार्यकाळात अशी एकही घटना घडणार नाही, यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार, असे अर्चित चांडक यांनी ठामपणे सांगितले.
अकोल्यात फक्त कायद्याचा सत्ताधारी हात नव्हे, तर नागरिकांशी संवाद, तंत्रज्ञानाचा वापर आणि कार्यपद्धतीत पारदर्शकता यांचीही अपेक्षा आहे. नागपूरच्या यशस्वी ट्रॅफिक मॉडेलनंतर, अकोल्यातही चांडक नवीन आयटी-बेस उपाययोजना राबवण्याच्या तयारीत आहेत. अर्चित चांडक यांची अकोल्यात झालेली बदली ही केवळ एक प्रशासकीय नेमणूक असेल खरी, पण ही बदली एका नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकते. एक असा अधिकारी ज्याच्या नावावर नागपुरात शिस्त आली, आता अकोल्याच्या रस्त्यांवरही शांततेची आणि सुरक्षिततेची चालना देईल, अशी अपेक्षा जनतेने ठेवली आहे.