महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीने शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. महायुती सरकार केवळ कोरड्या आश्वासनांमध्ये रममाण आहे. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्वरित मदत मिळवण्याचा निर्धार केला आहे.
महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचे रक्त आणि घाम मिसळले आहे. परंतु यंदाच्या अतिवृष्टीने त्यांच्या स्वप्नांना आणि मेहनतीला पाणी फेरले आहे. अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त परिस्थितीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महायुती सरकार मात्र केवळ कोरड्या आश्वासनांच्या पोकळ गप्पांमध्ये रममाण आहे. या संकटकाळात काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा आणि तात्काळ मदत मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या दुखण्यावर फुंकर घालण्यासाठी सरकारला खडबडून जागे करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा दुप्पट-तिप्पट पाऊस पडला आहे. 30 जिल्हे आणि सुमारे 300 तालुके अतिवृष्टी आणि पुराच्या विळख्यात सापडले आहेत. तब्बल 143 लाख हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली, जमीन खरडली गेली. शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत सरकार मात्र पंचनाम्यांच्या कागदी घोड्यांवर स्वार आहे. काँग्रेसने मात्र शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजार रुपये आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 5 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळेल.
काँग्रेसचा आधार
काँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांच्या सुख-दुखात सहभागी होत त्यांना आधार दिला आहे. जेव्हा लाल्या रोग, बोंड अळी किंवा गारपीट यांनी शेतकऱ्यांचे नुकसान केले. तेव्हा काँग्रेस सरकारने तातडीने मदत पुरवली. परंतु सध्याचे महायुती सरकार नियम, अटी आणि कागदी सोपस्कारांमध्ये अडकले आहे. काँग्रेसने या संकटाला तोंड देण्यासाठी समिती स्थापन करून पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. खासदार, माजी मंत्री आणि कार्यकर्ते यांचे पथक शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.
डोंबिवलीत एका 72 वर्षीय दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांना अमानुष वागणूक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या ज्येष्ठ कार्यकर्त्याला धमकावून त्यांचा अपमान करण्यात आला. अशा गुंडांचा इतिहास खून, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांनी काळवंडलेला आहे. काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. भाजपाला अशा गुंडांना आवरण्याचा इशारा देतो. जर अशा कृत्यांना आळा घातला गेला नाही, तर काँग्रेस कडक कारवाई करेल, असा स्पष्ट संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
काँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला आहे. सध्याच्या संकटातही पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत काँग्रेसने तातडीने मदत पुरवण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान पाहता, पंचनाम्यांच्या औपचारिकतांपेक्षा त्वरित आर्थिक मदत आणि कर्जमाफीची गरज आहे. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच सरकारवर दबाव आणण्यासाठी कटिबद्ध आहेत. या लढ्यात काँग्रेस शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करेल.