महाराष्ट्र

Maharashtra Budget Session : शेतकऱ्यांना शंभर टक्के सौर वीज; स्मार्ट मीटरवाल्यांना सवलत

Mahayuti Government : संपूर्ण वर्षभर दिवसा होणार पुरवठा

Author

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर विजेची समस्या भडसावत आहे. विजेची समस्या सोडवण्यासाठी सरकारने मोठी योजना तयार केली आहे. सौर ऊर्जेसह अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षभर वीज पुरवठा मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या विजेची मागणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेला वेगाने राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण वीज निर्मितीपैकी 52 टक्के वीज सौर ऊर्जा आणि अपारंपारिक पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. लवकरच राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षभर दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत 45 लाख शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज पुरवठा देण्यात आला आहे. त्यातून 16 हजार मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला आहे.

 

राज्य सरकारने पुरवठा करण्यासाठी 45 हजार मेगावॉटचा करार केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्राकडून जास्त दरामध्ये वीज खरेदी केली जात होती. मात्र वीज खरेदीचा दर कमी करण्यात आला आहे. येत्या एक वर्षांमध्ये कृषी क्षेत्राला सर्वाधिक वीज देणारे राज्य महाराष्ट्र ठरेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यापुढे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर जागावे लागणार नाही, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

सौर ऊर्जेला प्रोत्साहन

राज्यातील दीड कोटी ग्राहकांना विजेच्या बिलापासून मुक्त करण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे. यासाठी सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने योजना तयार केली आहे. तशीच योजना महायुती सरकार तयार करणार आहे. सूर्य घर योजनेच्या माध्यमातून घरगुती वापराच्या वीज बिलातून सामान्यांना सवलत देण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरवर्षी विजेचे दर नऊ टक्क्यांनी वाढतात. मात्र महावितरणने तयार केलेल्या एका खास योजनेमुळे विजेचे दर कमी होत जाणार आहेत. राज्यात 100 ते 300 युनिट विजेचा वापर असणाऱ्यांना मोठा दिलासा सरकार देणार आहे. याशिवाय स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना विज बिलामध्ये मोठी सूट दिली जाणार आहे. यासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर वापरण्याची गरज भासणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्यात कोणालाही स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राला 24 तास अखंड वीज देण्यासाठी महायुतीचे सरकार वचनबद्ध आहे. त्यामुळे शेतकरी आणि घरगुती ग्राहकांना दर्जेदार माध्यमातून वीज पुरवठा करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये ठामपणे नमूद केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!