
मातीवर विश्वास ठेवून शंभर दिवसात पीक येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी बियाणं पेरलं, पण 125 दिवसांनीही उगम न झाल्यानं फसवणुकीचं बीज शेतात नव्हे, तर त्यांच्या नशिबातच रुजलं.
शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे मातीशी जोडलेलं श्रमांचं मंदिर. रात्रंदिवस मेहनत करून आपल्या कुटुंबाचं पोट भरणाऱ्या या शेतकऱ्यांच्या घामाला जर फसवणुकीचं पाणी पाजलं गेलं, तर त्या वेदनेचा आवाज दूरवर ऐकू येतो. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील मांगली (चौ.) येथील शेतकऱ्यांना आसगाव येथील एका नामांकित बियाणे कंपनीने दिलेल्या बनावट वचनांनी अक्षरशः जमिनीवर आणलं आहे. KS Gold नावाचे धानाचे बियाणे 100 दिवसांत पीक येईल, असे सांगितले गेले. मात्र आज 125 दिवस उलटले तरीही शेतात धानाचे दर्शन झालेले नाही.
रब्बी हंगामासाठी मांगली (चौ.) येथील शेतकऱ्यांनी आसगावमधील श्री गुरुदेव कृषी केंद्र या दुकानातून केदार सीड्स कंपनीचे ‘KS Gold’ धानाचे बियाणे विकत घेतले. दुकान चालकांनी ठामपणे सांगितले – “हे बियाणे अवघ्या 100 दिवसांत धान उगम करते, पीक भरघोस येईल.” या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आपली मेहनत, पैसे आणि संपूर्ण हंगामाचं भवितव्य या बियाण्यांवर उधळलं. मात्र नियोजित 100 दिवस उलटून गेले. 125 दिवसही लोटले. पण शेतांमध्ये धान नुसता उगमही झाला नाही. हाती आले ते केवळ ओसाड माती, खर्चाचे डोंगर, आणि डोळ्यांतील अश्रू.

पदरी फक्त निराशा
वास्तव समोर येताच शेतकऱ्यांनी केदार सीड्स कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथून मिळालेला प्रतिसाद अधिकच धक्कादायक ठरला. शेतकरी नीलेश भुरे (वलनी) म्हणाले, आम्ही कंपनीकडे विचारणा केली. पण त्यांनी थेट सांगितलं की, ‘आम्ही काही भरपाई देणार नाही, जे करायचं असेल ते करा.’ अशा प्रकारे आमची सरळ फसवणूक झाली आहे. केवळ नीलेश भुरेच नव्हे, तर अनेक शेतकरी या बनवाबनवीचे बळी ठरले आहेत. कुलदीप वैद्य (मांगली) यांनी सांगितले की, गुरुदेव कृषी केंद्रातून घेतलेले KS Gold बियाणे मूळातच 130 दिवस लागणारे निघाले. यामुळे आमचा रब्बी आणि खरीप हंगामही पूर्णपणे वाया गेला आहे. यासंबंधी आम्ही तालुकास्तरावरील कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.
फसवणुकीचे पुरावे
या तक्रारीनंतर पवनी तालुक्यातील कृषी विभागाने याची गंभीर दखल घेतली. चौकशी सुरू झाली आणि अखेर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. कृषी अहवालानुसार, कंपनीने चुकीची माहिती देऊन अवास्तव दावा करत शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. फसवणुकीचा अहवाल हाती आल्यानंतर शेतकऱ्यांनी आता कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली असून, रब्बी व खरीप हंगामात झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मागितली आहे. या प्रकरणात संबंधित बियाणे कंपनी, कृषी केंद्र चालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शेतकऱ्यांना न्याय अपेक्षित
मांगली, वलनी, आसगाव परिसरातील शेतकरी आता एकवटले आहेत. फसवणुकीच्या या धक्क्यातून सावरत ते एकमुखाने सांगत आहेत. हा प्रकार केवळ आमच्यावर अन्याय नाही, तर तो संपूर्ण कृषी संस्कृतीवर आघात आहे. याला जर आत्ता आळा घातला नाही, तर उद्या हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होतील. या लढाईत शेतकरी नुसते बघ्याची भूमिका घेत नाहीयेत. त्यांनी आवाज उठवला आहे, चौकशीस भाग पाडलं आहे आणि आता ते न्यायालयीन दार ठोठावत आहेत. अशीच जागरूकता आणि एकजूट जर प्रत्येक शेतकऱ्याने दाखवली, तर कोणतीही कंपनी फसवणुकीचा विचारही करणार नाही.