
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील निवासस्थानी उत्साहात होळी साजरी केली. यावेळी त्यांनी समाजात सकारात्मकता आणि एकात्मतेचा संदेश देत होलिकेच्या ज्वाळांमध्ये वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आता होळीचे रंग उधळले जात आहेत. यंदाची होळी केवळ आनंद आणि उत्साहाचीच नाही, तर ती राजकीय हालचालींनीही सजलेली आहे. कुणी कुणावर स्नेहाचा गुलाल उधळत आहे, तर कुणी कुणाला लाल रंग दाखवत संघर्षाचा इशारा देत आहे. काही नेते मात्र आपल्या विरोधकांवर काळे रंग उधळून त्यांना निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत.
होळी हा रंगांचा, सौहार्दाचा आणि विजयाचा सण असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातही यंदा वेगवेगळे रंग दिसत आहेत. कुणी युतीच्या नवे रंग मिसळत आहे, तर कुणी नव्या समीकरणांचे रंग उधळत आहे. होळीचे मंगलमय पर्व सुरू झाला आहे. राज्यातील अनेक नेते व नागरिक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.

विजयाचे प्रतीक
होळीच्या पूर्वसंध्येला होलिका दहनाचा विधी संपन्न होतो, जो सत्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आपल्या मतदारसंघात होळीचा उत्सव साजरा केला. त्यांनी होळीच्या मंगलमय सणाच्या निमित्ताने आपल्या मतदारसंघातील नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. मात्र, या शुभेच्छांमध्ये केवळ सणाचा आनंद नव्हता, तर एक स्पष्ट राजकीय संदेशही होता.
मुनगंटीवार यांनी सांगितले की, होळी हा केवळ रंगांचा सण नाही, तर सत्याच्या विजयाचे आणि वाईट प्रवृत्तींच्या नाशाचे प्रतीक आहे. भक्त प्रल्हादाच्या भक्तीसमोर हिरण्यकश्यपूचा अहंकार आगीच्या ज्वाळांमध्ये भस्मसात झाला. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातही, असत्य, भ्रष्टाचार, आणि फुटीर प्रवृत्ती यांचा अंत होण्याची गरज आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले की, आपण सर्वांनी एकत्र येऊन राज्याच्या प्रगतीसाठी आणि चांगल्या नेतृत्वासाठी कार्य केले पाहिजे.
Dilipkumar Sananda : जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं
महाराष्ट्राचा नवा अध्याय
होळी हा जसा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे, तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातही नवे समीकरणे तयार होत आहेत. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले की, महाराष्ट्राला आता स्वच्छ आणि सुशासन देणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेसह महाराष्ट्रातील सर्व कष्टकरी, दिन-दुर्बल आणि सर्वसामान्य लोकांना होळीच्या शुभेच्छा देताना, मुनगंटीवार यांनी विकासाचा नवा संदेश दिला.
होळीच्या या पावन निमित्ताने, अनेक वर्षांपासून या प्रभागातील सर्व नागरिक एकत्र येतात आणि आनंदाच्या या उत्सवात सहभागी होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण होळीच्या रंगात रंगून जातो. ही होळी केवळ उत्सव नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक शुभ आशीर्वाद ठरो असे त्यांनी सांगितले. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला एकत्र येण्याचे आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. होळी ही परिवर्तनाची सुरुवात असते. ही होळी महाराष्ट्रासाठी एक नवा अध्याय लिहू दे, असे उद्गार त्यांनी काढले.