
पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संयम न गमावता थेट कृतीचा मार्ग स्वीकारला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तान व पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर अचूक प्रहार केला.
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेलेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा भारताने अत्यंत ठोस आणि निर्णायक प्रत्युत्तर दिलं आहे. 6 मे मंगळवारी रात्रीच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये एकाच वेळी 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने राबवलेल्या या संयुक्त लष्करी कारवाईने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी देशभक्तीच्या भावना व्यक्त करत एकच जल्लोष केला आहे.
भारतीय सैन्य आणि हवाई दल यांनी एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवली. हल्ल्याच्या प्रमुख निशाण्यावर लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या अतिरेक्यांचे तळ होते. जवळपास 7 शहरांमध्ये विखुरलेल्या या अड्ड्यांवर अचूक मार्गदर्शन यंत्रणेसह क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यांमुळे दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. या कारवाईनंतर माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) मनोज नरवणे यांनी समाजमाध्यमांवर “अभी पिक्चर बाकी है…” असे सूचक ट्विट करत पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला. त्यांनी सूचित केले की, जर पाकिस्तानकडून भारतातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करत संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न झाला, तर भारताची आणखी कडक कारवाई अजिबात शक्य आहे.

Operation Sindoor : एअर स्ट्राईक करत सगळ्यांची तोंडं केली बंद
निर्णायक पाऊल
संपूर्ण कारवाईदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरापर्यंत ऑपरेशनवर नजर ठेवली. उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्यांसोबत सातत्याने संपर्कात राहून त्यांनी मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यावर अपडेट घेतला. हे केवळ लष्करी नाही तर राजकीय पातळीवरही अतिशय निर्णायक पाऊल मानले जात आहे. पाकिस्तानकडून भारतावर 24 क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र भारताने हे दावे फेटाळत सांगितले की, कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. ही कारवाई केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच केंद्रित होती, आणि त्याचं अचूक नियोजन करून दहशतवादी नेटवर्कला मोठा झटका दिला आहे.
दहशतवाद्यांना त्यांच्याच भूमीत चोख प्रत्युत्तर देत भारताने स्पष्ट केलं आहे की, आता दहशतवादाला मुळासकट नष्ट केल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही अशा प्रकारच्या कारवायांची केवळ सुरुवात असल्याचे संकेत लष्करी सूत्रांकडून दिले जात आहेत. माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या सूचनेनुसार, भारताकडे अधिक प्रबळ योजना तयार आहेत. पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने केवळ निषेध करून न थांबता, कृतीतून जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे. देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली धाडसी आणि प्रभावी भूमिका भारताने घेतली आहे. यानंतर दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना प्रत्येक कृतीचा दहापटीने प्रतिउत्तर मिळेल, हे स्पष्ट झाले आहे.