महाराष्ट्र

IAS Transfers : विदर्भात बदलले नेतृत्वाचे चेहरे 

Wardha - Amravati : प्रशासकीय फेरफार पुन्हा वेगात 

Author

राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र पुन्हा एकदा उसळलं आहे. 17 जून रोजी झालेल्या चार बदल्यांमध्ये वर्धा आणि अमरावतीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

राज्य प्रशासनाच्या पटावर पुन्हा एकदा फेरबदलांची चाल डावली आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्यानंतर, पुन्हा चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करत प्रशासनात नवसंजीवनी फुंकली आहे. विशेष म्हणजे, यावेळी वर्धा आणि अमरावती या विदर्भाच्या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नेतृत्वबदल होऊन नवे संकेत मिळत आहेत.

शहरी झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनामध्ये प्रभावी कार्यक्षमता बजावणारे आणि ठाण्यातील मुंबई मेट्रो रिजन स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आयएएस पराग सोमन यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पराग सोमन यांनी शहरी प्रशासनातील काटेकोर योजना अंमलबजावणीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ग्रामीण आणि कृषिप्रधान जिल्ह्यात त्यांचे नेतृत्व वर्ध्याच्या विकासदृष्टीत कोणते नवे पर्व लिहतीलल, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

तंत्रशुद्ध कार्यशैली

वर्ध्याचे सध्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिथिन रहमान यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांनी कोविड काळात आणि ग्रामीण योजनांच्या अंमलबजावणीत सशक्त प्रशासकीय भूमिका बजावली होती. बीडसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात त्यांची तंत्रशुद्ध कार्यशैली किती रंग भरते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

आयएएस सौम्या शर्मा-चांडक यांची अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती ही एक उल्लेखनीय बाब ठरत आहे. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओ पदावर कार्यरत असताना त्यांनी टेक्नोलॉजीच्या माध्यमातून नागपूरला नव्या शहरी उंचीवर नेण्याचे प्रयत्न केले. आता अमरावतीसारख्या महत्त्वाच्या शहरात त्यांचे आगमन म्हणजे स्मार्ट गव्हर्नन्सच्या दिशेने एक निर्णायक पाऊल मानले जात आहे.

Harshwardhan Sapkal : भाजपचं नवं सूत्रं गुन्हे मागे टाका, पक्षात या

प्रशिक्षणाला अधिक धार

अमरावती महापालिकेचे आयुक्त राहिलेले सचिन कलंत्रे यांची YASHADA (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे) येथे उपमहासंचालकपदी बदली झाली आहे. YASHADA ही राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय प्रशिक्षण संस्था असल्याने, कालंत्रेंचा अनुभव प्रशासन प्रशिक्षणाला अधिक धार देईल, हे निश्चित.

या फेरबदलांनी केवळ पदे बदलली नसून जिल्ह्यांची ऊर्जा, दिशा आणि प्रशासकीय मनोवृत्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः विदर्भातील वर्धा आणि अमरावतीसारख्या जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती ही त्यांच्या विकासधारेत नव्या आयामांची भर घालू शकते. प्रशासनातील या नव्या युगाची पहाट म्हणजे, जिथं नियोजन केवळ कागदावरच न राहता, जमिनीवर ठसा उमटवते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!