
गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा माओवाद्यांविरोधात धडक कारवाई करून माओवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. हळूहळू गडचिरोली जिल्हा विकास करीत आहे.
कधी माओवाद्यांच्या छत्रछायेखाली वळण घेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याने आता विकासाच्या दिशेने ठळक पाऊल टाकले आहे. सरकार, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सातत्याने चालवलेल्या मोहिमांमुळे या नक्षलवादी चळवळीवर मोठा धक्का बसत आहे. काही माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे, तर काहींचे प्राण संरक्षण यंत्रणेच्या कारवायांमध्ये गमावले गेले आहेत. मात्र, या लढाईत 22 मे रोजी (गुरुवारी) पुन्हा चार माओवाद्यांनी आपले प्राण गमावले आहे. ज्यामुळे गडचिरोलीतील माओवादी नियंत्रणाच्या विरूद्धची लढाई पुन्हा एकदा थेट रंगली आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे हद्दीत माओवाद्यांनी दबा धरल्याच्या विश्वसनीय माहिती मिळाली होती. यावरून, अति. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली 12 सी 60 पथक (300 कमांडो) आणि CRPF एक तुकडी मुसळधार पावसात रवाना करण्यात आली. ही मोहीम कवंडे व नेलगुंडा येथील इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात राबवण्यात आली.सकाळी पोलीस पथकाने घेराबंदी करून परिसरात शोध मोहीम राबवली असताना, माओवाद्यांनी सी-60 जवानांवर अचानक जोरदार गोळीबार सुरू केला.

विशेष ऑपरेशन सुरू
जवळजवळ दोन तासादरम्यान चाललेल्या ह्या धडक्यामध्ये पोलीसांनी प्रभावी प्रत्युत्तर दिले. या थरारक चकमकीत चार कट्टर माओवाद्यांचा बळी लागला. घटनास्थळी स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल (SLR), दोन .303 रायफल आणि भरमार यंत्र देखील जप्त करण्यात आले आहे. याशिवाय वॉकी-टॉकी, नक्षलवादी साहित्य, आणि छावणी साहित्य देखील पोलीसांनी हस्तगत केले आहे. घटना घडलेल्या परिसरात अजूनही उर्वरित माओवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू असून, पुढील माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.
यापूर्वीही भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलिसांनी नव्याने उभारलेल्या माओवादी तळाचा शोध घेतला आणि तो उद्ध्वस्त केला होता. कवंडे पोलीस ठाण्याजवळील या कारवाईत माओवादी योजनांना मोठा धक्का बसला असून, परिसरात माओवाद्यांची कोंडी करण्यात यश आले होते. 10 मे रोजी कवंडे परिसरात माओवाद्यांनी नवा तळ उभारल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 कमांडोच्या 200 जवानांनी तातडीने विशेष ऑपरेशन सुरू केले होते.
Chintaman Vanjari : शिक्षक भरतीच्या चक्रातच सापडले चौकशी अधिकारी
11 मेच्या रात्री सुरू झालेल्या या मोहीमेने नक्षलवादी गटाच्या मनसुब्यांवर जोरदार धक्का दिला असून, या भागात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे.गडचिरोलीमधील या सुरक्षात्मक प्रयत्नांनी जिल्हा हळूहळू माओवाद्यांच्या छत्रछायेतून बाहेर येत विकासाच्या मार्गावर चालत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेनं दिलेल्या या धाडसी कारवाया भविष्यातही सुरू राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.